मलठण – यंदाचा मोसमी पाऊस जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षाकमी झाला असला तरी गणेशोत्सवात वरूणराजाची कृपा झाली. या दरम्यान पुण्याच्या घाट माथ्यावर जोरदार पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे, सोलापूर, नगर, धाराशिव जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या उजनी म्हणजे यशवंत सागर जलाशयात 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत 52.22 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा वाढला आहे.
परतीचा पाऊस असाच पडत राहिल्यास पंधरा दिवसांत धरण 80 ते 100 टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या वर्षीचा पावसाळा सुरू होऊन चार महिने उलटून गेले तरीपण उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. दि. 6 मे रोजी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा शून्यावर येऊन ऐन पावसाळ्यात दि. 9 जुलै रोजी वजा 36.19 एवढ्या प्रमाणात पाणीसाठा खालावला होता.
तर दि. 1 ऑगस्ट रोजी धरणाचा पाणीसाठा पुन्हा “प्लस’वर आला. पुणे परिसरातील उजनी धरणाच्या साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने संथ गतीने उपयुक्त पाणीसाठा 28 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यातील बारा धरणे शंभर टक्के भरल्याने भीमा नदीतून उजनी धरणात कमी अधिक प्रमाणात आवक सुरू आहे. त्याचा फायदा धरणातील पाणी पातळी वाढीस होत आहे.
विसर्ग बंद
उजनी धरणाच्या वाढलेल्या पाणीसाठ्याने पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्यांसह सोलापूर, नगर, धाराशिव जिल्ह्यातील शहरांसह शेतकऱ्यांची आता तरी चालू घडीला चिंता मिटली आहे; परंतु काही दिवसात पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याने, धरण 100% भरेल की नाही याची चिंता बळीराजाला सतावत आहे. सध्या उजनी धरणातून भीमा नदीसह सर्वच प्रकल्पात पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.
पावसाआभावी उजनी धरणातील पाणीसाठ्याची चिंता आम्हा सर्वच शेतकऱ्यांना सतावत होती; परंतु गणेशोत्सव काळात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे, उजनी धरण 50 टक्के भरले आहे. तूर्तास दिलासा मिळाला असला तरी, हे पाणी वर्षभर पुरेल असे वाटत नाही. रिटर्न मान्सून बरसला तर उजनी धरण 100 टक्के भरेल अशी आशा आहे. -भालचंद्र तुकाराम चव्हाण, शेतकरी मलठण (ता. दौंड)