पिंपरी – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde fadanvis sarkar) सहभागी होऊन तीन महिने झाल्यानंतरही पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (ncp) नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा सुरू होत्या. बुधवारी (दि.4) पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकत्व दिले. त्यामुळे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) च्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून आता शहरातील विविध प्रश्न, समस्या मार्गी लागतील, तसेच पक्षाला स्थानिक पातळीवर पुन्हा बळकटी मिळेल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.
राज्यात 2 जुलैला राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्याही देण्यात आल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पिंपरी महापालिकेत येऊन आयुक्तांसमवेत आढावा बैठक घेतली. पुण्यातही पवारांनी बैठकांचा धडाका लावता होता. परंतु तीन महिने झाले तरी पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्याने उपमुख्यमंत्री पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. बुधवारी (दि.4) राज्यातील 12 जिल्ह्यातील सुधारित पालकमंत्री पदाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे एकेकाळी अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. मात्र, 2014, 2019 च्या लोकसभा, विधानसभा आणि 2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर हे समीकरण बदलले. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतरही शहरातील बहुतांशी पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार यांच्याच पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहेत. आता पवार यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर शहरातील पाणी प्रश्न, पुनावळे येथील कचरा डेपोच्या जागेचा प्रश्नांसह विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असा दावा अजित पवारांचे समर्थक करत आहेत. दुसरीकडे सत्तेत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेली मरगळ देखील दूर होऊन पक्षवाढीस मदत होईल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी महापालिकेतील प्रलंबित प्रश्नांची यादीही मागविली होती. पवार अर्थमंत्री असले तरी महापालिकेतील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना मर्यादा येत होत्या. गेल्या तीन महिन्यांपासून पालकमंत्री पदावर पवार यांची नियुक्ती होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही काही प्रमाणात अस्वस्थता होती. मात्र, आता पवार यांच्याकडेच जिल्ह्याचे पालकमंत्री पद आल्यानंतर शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रश्न मार्गी लागणार का?
शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी 2008 मध्ये उपमुख्यमंत्री पवार यांच्या संकल्पनेतूनच पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला होता. मात्र, 2011 मध्ये मावळातील शेतकऱ्यांचे आंदोलन झाले आणि गोळीबार सारखी घटना घडली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. मात्र, गेल्याच महिन्यात या प्रकल्पावरील स्थगिती उठविण्यात आली. आता उपमुख्यमंत्री पवारच पालकमंत्री झाल्याने स्वतः पुढाकार घेऊन ते सर्व पक्षीयांना विश्वासात घेऊन जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भाजप, शिवसेनेला सोबत घेऊन काम करावे लागेल
राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तीन पक्षाचे सरकार आहे. आता पुण्यासारख्या जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील भाजप, शिवसेनेच्या खासदार, आमदारांसह पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पवार यांना काम करावे लागेल.