मांजरी उपबाजार ः राजू शेट्टींसह सदाभाऊ खोत आंदोलनात सहभागी होणार
सोरतापवाडी: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात शेतकरी ते थेट ग्राहक विक्री असताना संचालक मंडळांनी खोतेदारांना शेतमाल विक्रीसाठी परवानगी दिल्याने शेतकर्यांनी आंदोलन छेडले असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळापैकी संचालक सुदर्शन चौधरी यांनी सर्वप्रथम शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आंदोलनात उडी घेतली.
आज पाचव्या दिवशी संचालक रोहिदास उंद्रे व रवींद्र कंद यांनी शेतकर्यांची भेट घेऊन हा बाजार शेतकर्यांचाच असून इथे फक्त शेतकरी ते ग्राहक असा बाजार चालणार असल्याचे सांगत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी व रयत क्रांती संघटनेचे प्रमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत हे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
तसेच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर हे आंदोलन सुरू झाल्यापासून शेतकर्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहे. त्यामुळे आता बळीराजाला नवीन बळ येणार आहे. ही आंदोलनाची लढाई नक्कीच जिंकतील अशी आशा शेतकर्यांना लागून राहिली आहे. तसेच हवेली व दौंड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पत्रक देऊन शेतकर्यांना पाठिंबा दिला आहे; परंतु अजूनही हवेली तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
हा बाजार कुठल्याही पक्षाचा नसून फक्त शेतकर्यांचा आहे याचा विचार सर्व पक्षातील पदाधिकार्यांनी करून फक्त शेतकरी बाजारासाठी शेतकर्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती हवेलीतील अनेक शेतकर्यांनी केली आहे. माजी उपसभापती रवींद्र कंद यांनी सांगितले की, हा बाजार फक्त शेतकर्यांचा असून कोरेगाव मूळ येथील जागेत खोतीदारांना परवानगी दिली आहे. थोड्याच दिवसात तिथे बाजार सुरू होणार आहे. मांजरी बाजारात काही कडक अटी टाकून खोतीदारांना परवानगी दिली आहे. परंतु या अटीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.
-रवींद्र कंद, माजी उपसभापती
मांजरी उपबाजाराची संकल्पना शेतकरी ते थेट ग्राहक असून शेतकर्यांना दोन पैसे कसे जास्त मिळतील व ग्राहकांना ताजा माल मिळेल व विक्री करताना त्यांना दोन पैसे मिळतील यासाठी हा बाजार आहे. त्यामुळे ग्राहक व शेतकर्यांनी या संकल्पनेचे स्वागत केले आहे. खोतीदार व दुबार विक्री करणारे या बाजारात शेतीमालाचे भाव पाडून शेतकर्यांचा माल घेत असतात त्यामुळे शेतकर्यांचे खूपच नुकसान होते. आम्ही शेतकर्यांसाठीच निवडून गेलेलो असून कितीही संघर्ष करावा लागला तरी आम्ही शेतकर्यांचीच बाजू घेणार.
-रोहिदास उंद्रे, संचालक बाजार समिती
व्यापाराच्या दबावाला बळी पडून संचालक मंडळांनी एक फेब्रुवारीपासून मांजरी उपबाजारात खोतीदार विक्री चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकर्यांवर खूप मोठ्या अन्याय झाला आहे. हवेली तालुक्यातील अनेक गाव पुढारी हे व्यापार्यांची बाजू घेत असून एक शेतकरी संघटना ही शेतकर्यांच्या बाजूची नसून व्यापार्यांची बाजु घेऊन शेतकर्यांना बिर्याणीचे आमिष दाखविले होते. परंतु बळीराजा त्या आमिषाला बळी न पडता आंदोलन आणखीन तीव्र केले.
-सुदर्शन चौधरी, संचालक