दोन महिन्यांपूर्वीच वळसे यांच्याविषयी केले वक्तव्य
राजेंद्र वारघडे
पाबळ – दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या महिला पदाधिकारी यांनी केलेले भाकीत राज्यातील सत्तापटलावर घडलेल्या घडामोडीबाबत तंतोतंत खरे उतरले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नऊ आमदारांनी भाजपात प्रवेश करून मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हेही सहभागी झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का होता. भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने दोन महिन्यांपूर्वी काही मोजक्या पत्रकारांसमोर ही माहिती सांगितली होती.
एप्रिल महिन्यात मूळच्याच भाजपत असलेल्या परंतु काही काळ भाजपपासून दुरावलेल्या एका ज्येष्ठ महिला पदाधिकाऱ्याने पुन्हा एकदा स्वगृही (भाजपमध्ये) प्रवेश केला. त्या निवडणुकीच्या तयारीला लागल्या. त्यांनी एक पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेत सर्वच पत्रकारांनी या महिला पदाधिकारी शिरूरमधून लढणार की आंबेगावमधून, असा प्रश्न विचारला होता. याची उत्सुकता लागली होती.
या महिला पदाधिकारी भाजपच्या तर दिलीप वळसे पाटील व अशोक पवार हे राष्ट्रवादीचे. त्यामुळे या दोन्हीपैकी एका मतदारसंघात या पदाधिकारी आमदारकीसाठी निवडणूक लढवतील, याची खात्री होती. पण तरी दोन्हीपैकी कोणत्या मतदारसंघात या पदाधिकारी निवडणूक लढवणार, याची उत्सुकता पत्रकारांना होती.
त्यावेळी पत्रकार परिषद सुरू असताना सर्वच पत्रकारांसमोर या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले होते. मात्र, काही मोजक्या पत्रकारांनी त्यांना पत्रकार परिषदेनंतर तुम्ही आमदारकी शिरूरमधून लढवणार की आंबेगावमधून लढवणार, असा प्रश्न पुन्हा विचारला होता. त्यावेळी त्यांनी शिरूरमधून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट उत्तर दिले होते.
महिला पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही मोजक्या पत्रकारांसमोर त्यांनी दिलीप वळसे पाटीलही भाजपमध्ये येत आहेत. राज्यातील सत्तेच्या सारीपाटावर घडलेल्या घडामोडीनंतर महिला पदाधिकाऱ्यांनी वर्तविलेले भाकित तंतोतंत सत्यात उतरले.
चकित करणारे विधान…
आंबेगाव मतदारसंघात वळसे पाटील यांची मतदारसंघावर मांड पक्की आहे. तुम्ही आंबेगाव- शिरूर मतदारसंघामधून का निवडणूक लढवणार नाही, असा प्रश्न उत्सुकतेपोटी पुन्हा विचारलाच. त्यावेळी त्यांनी क्षणार्धात दिलेले उत्तर त्या मोजक्या पत्रकारांना मानवणारे नव्हतं. अर्थात ते उत्तर होतं, मी शिरूर आंबेगावमधून निवडणूक लढवणार नाही. कारण वळसे पाटील हे भाजपमध्ये येत आहेत. त्यावेळी कोणालाही विश्वास बसला नाही. मात्र, दिलीप वळसे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे व मंत्रीपदाच्या शपथेमुळे दोन महिन्यानंतर संपूर्ण राज्यातील जनतेला विश्वास ठेवावा लागला.