पुरंदरमध्ये वाड्या-वस्त्यांवर धावताहेत टॅंकर : उसाच्या वाढ्यावरच भिस्त
डोंगर व परिसर चाऱ्यावाचून ओसाड
वाल्हे – पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने तालुक्यात अनेक गावांत जनावरांचा चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. तसेच अनेक गावांत वाड्या-वस्त्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून पुढील काही दिवसांतच भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याची भीती पशुपालक व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील अनेक गावांत पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नसल्याने शेतात तर हिरवा चारा मिळेल जिकीरीचे बनले असून अनेक पशुपालक उसाचे वाढे चारा म्हणून जनावरांना घालत आहे.
पुढील काळात पशुधन वाचवायचे असेल तर शासनाने त्वरीत जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शासनाने त्वरित शेजारील तालुक्यातील गावातून जनावरांना चारा आणून पुरंदर तालुक्यातील पशुधन वाचवावे, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे.
तालुक्यातील अनेक गावातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यातच चाऱ्याचे भाव गगनाला भिडले असून पावसाअभावी यंदा खरीप हंगामातील हिरवा चाऱ्याचे उत्पादन आले नाही. यावर्षी, तालुक्यातील अनेक भागात उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर धावत आहेत.
शासनाने जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून पुरंदर तालुक्यातील पशुधन वाचवावे. नाहीतर पुढील काही दिवसांतच, पशुपालक, दावणीची जनावरे विक्रीसाठी काढतील.
– भाऊसाहेब पवार, वाल्हे
तो चाराही करपून गेला
सुरुवातीला रिमझीम झालेल्या पावसावर खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. पाऊस नसल्याने पिके कोमेजून गेली होती. तसेच डोंगर परिसरात थोड्या प्रमाणात जनावरांना चरण्यासाठी चारा उपलब्ध झाला होता. मात्र, मागील महिन्यांपासून हा चारा देखील करपून गेला असून आता पशुधन संकटात आले आहे.
असे आहेत दर
सध्या चाऱ्याचे दर वाढले असून उसाचा दर 4 हजार रुपये टन, कडबा 5 हजार रुपये शेकडा तर घास शेकडा दर 500 रुपये, हिरवा मका 3 हजार 500 रुपये आहे. चाऱ्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्याचे अर्थकारणच कोलमडले आहे.
पाणीही विकत घेण्याची वेळ
दुभत्या जनावरांसाठी आवश्यक असलेला ताजा हिरवा चाऱ्याची देखील वाणवा आहे. मिळेल त्या ठिकाणाहून मिळेल त्या किंमतीत हिरवा चारा उपलब्ध करून घेतला जात आहे. काही शेतकऱ्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चाऱ्यासाठी अधिकचा खर्च नुकसानीत वाढ करणारा आहे.
यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक भागात चाऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पीके सुकून गेले आहे. मागच्या वर्षाचा चारा संपला आहे. त्यामुळे विकत चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहे. पुढील काही दिवसांत जनावरे जगवावी कशी ? याचीच चिंता लागली आहे.
– नारायण पवार, दूध उत्पादक शेतकरी, वाल्हे