बचाव कृती समितीच्या वतीने लढा उभारणार
पळसदेव – उजनीच्या धरणग्रस्तांना हक्काच पाणी मिळावं, उजनी धरणातून तरतूद नसताना बेकायदेशीर रित्या सोडण्यात येणार पाणी या पुढील काळात बंद व्हावं व ज्या प्रमाणे उजनी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्याप्रमाणे उजनी धरणात इतर धरणातून पाणी सोडण्यात यावे. 30 जून 2024 पर्यंत सर्वांना पाणी पुरेल याप्रमाणे सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचं नियोजन व्हावे, या मागण्यासाठी शेतकऱ्यांचा उजनीधरणग्रस्त बचाव कृती समितीच्या वतीने लढा उभारणार असल्याचं समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी सांगितले.
शुक्रवारपर्यंत (दि. 17) उजनी धरणात 44.40 टक्के पाणीसाठा आहे. या वर्षी गणपती बाप्पाच्या कृपेने पाऊस बरसला आणि उजनी धरण 66 टक्केपर्यंत भरलं होत. संपूर्ण राज्यात विविध भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने अनेक धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यात उजनी धरणाची देखील हीच अवस्था आहे. त्यामुळे या वर्षी पुन्हा उजनीच्या पाण्याचं काटेकोर नियोजन झालं पाहिजे. विनाकारण राजकीय फायद्यासाठी धरणग्रस्तांच्या बळी जाणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे.
उजनी धरणाच्या निर्मितीपासून फक्त एकदाच उजनीच्या पाण्याचं काटेकोर नियोजण झालं होत. सोलापूर जिल्ह्याला तुकाराम मुंढे जिल्हाधिकारी असताना सन 2015 मध्ये उद्भवलेली टंचाईची परिस्थिती त्यांनी कौशल्याने हाताळली होती. त्यावेळी धरणात 10 टक्के पाणीसाठा असताना, त्यांनी वर्षभर पाणी पुरविण्याचे नियोजन केले होते; मात्र त्यांच्यानंतर अद्यापपर्यंत कौशल्याने पाणी नियोजन करण्याचे धाडस कोणी केले नाही. केवळ त्याचवर्षी उजनी पाण्याच्या बाबत राजकारणी उजनीच्या पाण्याचं राजकारण करण्यात अपयशी ठरले होते.
धरणात मायनस 40 टक्के पाणीसाठा झाल्यावर उजनी काठावरील अगदी धरणाजवळील गावातील देखील बऱ्याच शेतीच्या पाणी योजना, अनेक गावाच्या पाणी पुरवठा योजना बंद पडतात. त्यामुळे पाणीसाठा इतका कमी होणार नाही याचे काटेकोर नियोजन होणे अपेक्षित आहे. सन 2001, 2002, 2012, 2015, 2016 मध्ये धरणातील मृतसाठ्यातील पाणी वापरण्यात आले होते. यामध्ये सन 2016-17 मध्ये मायनस 59.72 टक्क्यांपर्यंत धरणातील पाणीसाठा खालावला होता. त्या वेळी घरणग्रस्ताची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे यावेळी ही परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी धरणग्रस्तचं लढा उभारला जाणार आहे.
दरवर्षीच संघर्ष
पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर कायमच राजकारण केलं जात आहे. विविध पक्षाचे राजकीय नेते मंडळी केवळ मताचा विचार करून उजनी पाण्याचा कायमच विषय प्रलंबित ठेवतात; मात्र या राजकारणी मंडळींच्या स्वार्थापायी उजनी धरणग्रस्तांच्या संसार उघड्यावर येत आहे. दरवर्षी उजनीच्या पाण्यासाठी धरणग्रस्तांना संघर्ष करावा लागत आहे. म्हणून उजनी काठावरील पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच गावात जाऊन धरणग्रस्त शेतकऱ्यांना एकत्र आणून उजनीच्या पाण्यासाठी लढा उभारण्याचा संकल्प अरविंद जगताप यांनी केला असल्याचे सांगितले.