उपाययोजना राबविण्यास सुरुवात : तरीही उणीवा दूर करण्याची गरज
खडकवासला – महानगर पुण्याचे अगदी जवळच असलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंहगडाचे पर्यटनदृष्ट्या असलेलं महत्त्व विचारात घेऊन सार्वजनिक सुट्टीचे दिवशी सिंहगड घाटरस्त्यात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता वनखाते सरसावले आहे. पुणे वनविभागाचे स्थानिक अधिकारी आणि कर्मचार्यांनी मागील दोन आठवड्यांत घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समितीचे मदतीने सिंहगड घाटातील वाहतूक कोंडी बर्यापैकी कमी करण्यात यश मिळवले. तरी यातील आणखी काही उणीवा दूर केल्यास सिंहगड घाटात होणार्या कोंडीतून सिंहगडावर येणार्या पर्यटकांची सुटका होण्यास मदत होऊ शकते.
भांबुर्डा वनपरिक्षेत्राअंतर्गत खानापूर व सिंहगड स्थित वन कर्मचार्यांनी सिंहगड घाटरस्त्यातील नेहमीची वाहतूक कोंडी फोडण्याचे आता कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील आणि वनरक्षक बळीराम वायकर यांनी घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समितीचे सुरक्षारक्षकांमार्फत मागील दोन आठवड्यांपासून सिंहगड घाटातील वाहतूक कोंडी, गड परिसर स्वच्छता आणि आतकरवाडी – पायथा रस्ता स्वच्छता अभियानावर भर दिलेला आहे.
भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचार्यांनी किल्ले सिंहगड व वनक्षेत्राचे दैनंदिन व्यवस्थापनाचे बाबतीत वेळापत्रक तयार करून वनसंवर्धन, गड परिसर स्वच्छता, पायथा रस्ता प्लॅस्टिक कचर्याची विल्हेवाट आणि घाट रस्ता वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजनावर लक्ष केंद्रित केले आहे.
मागील आठ- दहा दिवसांपासून वनवा प्रतिबंधक उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. घाटातील रस्त्यालगतचा राडारोडा हटविण्यात आल्याने वाहतूकीला येणारे काही अडथळे दूर झाले असून वाहनतळावरील पार्किंगचे वापरातील उणीवा दूर करण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक प्रवासी, वाहनचालक व विक्रेत्यांना विश्वासात घेऊन गडाचे वाहनतळावरील पार्किंगची क्षमता वाढवण्यासाठी काही नियमावली केल्याने त्याचे उचित परिणाम देखील दिसून आलेत.
वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील व वनरक्षक बळीराम वायकर हे शनिवार, रविवारी व इतर सार्वजनिक सुट्टीचे दिवशी घाटरस्त्यातील वाहतूक व्यवस्थापनावर स्वतः उपस्थित राहून लक्ष ठेवून असल्याने नेहमीची कोंडी टाळण्यात वनविभाला बर्यापैकी यश आले आहे. सिंहगड घाटरस्त्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त पर्यटकांना सहकुटुंब सहलीचा आनंद घेता यावा या साठी वनकर्मचार्यांनी वरीष्ठ अधिकार्यांचे मार्गदर्शन घेत काही बाबतीत कडक भूमिका घेण्यास सुरुवात केल्यामुळे परिस्थितीत सुधारणा होऊ लागलेचे दिसून येत आहे.
आणखी उपाययोजनांची गरज
* वनव्यवस्थापन समिती व वनविभागात समन्वय आवश्यक
* घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समिती अस्तित्वात असली तरी संपूर्ण नियंत्रण वनविभागाकडे असल्याने पर्यटकांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी पर्यटकांसाठी आता वेळेची कालमर्यादा निश्चित करण्याची आवश्यकता
* राज्यातील आर्थिक दृष्ट्या सक्षम समजल्या जाणार्या वनव्यवस्थापन समितीचे कर्मचारी चार-पाच वर्षांपासून गणवेशाविनाच
* सुरक्षारक्षकांना गणवेश नसल्यामुळे वाहतूक कोंडी दूर करताना मर्यादा येते
* वाहनतळ पार्किंगच्या व्यवस्थेत बदलाची गरज
* पार्किंग पट्टे नसल्यामुळे वाहनतळावर वाहने चुकीचे पद्धतीने लागतात. परिणामी वाहनतळाची क्षमता घटते
* गडावरील वाहनतळाची सुधारणा करण्याची आणि वाहनतळावरील वाहनांची क्षमता करण्याची गरज
* प्लॅस्टिक कचर्याचे संदर्भात कडक भूमिका घेण्याची गरज. वाहन तपासणीचे अंमलबजावणी गरज