जिल्हाधिकार्यालयाकडून पत्र; उपोषणकर्ते उपोषणावर ठाम
आळंदी – इंद्रायणी नदी प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या सर्व सांडपाण्याचा सविस्तर अभ्यास करून सर्वसमावेशक सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याच्या कामाबाबत व पुढील कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 25) बैठक आयोजित केली आहे.
उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून उपोषण स्थगित करून सहकार्य करण्याची विनंती पत्र जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे सहयक आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांचे उपोषणकर्त्यांना मिळाले असले तरी उपोणकर्ते उपोषणावर ठामच आहेत.
आळंदी येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवार (दि. 15) पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
शनिवारी (दि. 20) या उपोषणाचा पाचव्या दिवशीही महाद्वार चौकात मोहनानंद महाराज ओवाळ, हभप मुबारक शेख, फारूक इनामदार, हभप दत्तात्रय साबळे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने उपोषण स्थळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी भेट देऊन त्या संदर्भात चर्चा केली. याबाबत माहिती उपोषणकर्त्यांनी दिली. तसेच इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी उपोषण सुरूच असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तीर्थक्षेत्र विकास आराखडा कार्यकारणी समितीची विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दिनांक 25 जानेवारी रोजी आयोजित केली आहे. मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांच्या मार्फत संदर्भ क्रमांक 4 अन्वये प्राप्त अहवालानुसार, आळंदी नगरपरिषद हद्दीतील 4 एमएलडी क्षमतेच्या एसटीपी प्रकल्पास तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत मंजुरी प्राप्त असून या प्रकल्प निविदा प्रक्रिया टप्प्यावर असून कार्यकारणी समितीच्या बैठकीत एसटीपी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवून पुढील कार्यवाही करण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद केले आहे.