सातारा – ईव्हीएम मशिनबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. हे मशीन हॅक करता येत असल्याने देशाचे संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनवर मतदान न घेता मतपत्रिकांवरच घेण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी (दि. २३) सकाळी दहा वाजता राजवाडा येथील गांधी मैदानावरुन ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा निघणार आहे, अशी माहिती पद्मश्री व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्ययात्रेचा समारोप होणार आहे. या अंत्ययात्रेत कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष, शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी व सर्व घटक पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती माने यांनी दिली. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन हॅक करता येते हे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील भानुप्रतापसिंग आणि त्यांच्या सहकारी वकिलांनी जंतरमंतरवर देशाला दाखवून दिले आहे.
मशिनचे कुठलेही बटण दाबले तरी मत कमळावरच जात असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे कोट्यवधी मतदारांच्या मतांची चोरी होत असल्याने भारताची लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. निवडणूक आयोगात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. इव्हीएम मशिनबाबत देशभरात तक्रारी असतानाही सत्ताधारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. मतदान पत्रिकांवर निवडणुका घ्यायला सरकार घाबरत असल्याचा आरोप श्री. माने यांनी केला.
लोकसभेतील बहुमताचा वापर करून विरोधकांना संसदेबाहेरचा रस्ता दाखवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला डावलून अनेक कायदे पास केले जात आहेत. ईव्हीएम मशिन व व्हीव्ही पॅट मशिनबाबत प्रचंड तक्रारी आहेत. भारतीय जनता पक्ष वगळता संपूर्ण देशाचे मत आहे की निवडणुका मतपत्रिकांवर घ्यावात. त्यासाठी विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लक्ष्मण माने यांनी केले.