येरवडा – पुणे शहराचा स्वच्छ भारत अभियानामध्ये पहिल्या १० मध्ये क्रमांक आला आहे. मात्र, शहरातील अनेक भागाची अवस्था पाहता कोणत्या निकषानुसार हा क्रमांक दिला गेला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नगर रस्ता आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या परिसरातील ओला कचरा पाठविण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आला आहे.
या रॅम्पमध्ये स्वच्छतागृह उभारण्यात आले नाही. तसेच, कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणीही दुसरीकडून आणावे लागत आहे. काम करण्याच्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी आणि स्वच्छतागृह नसल्याने नैसर्गिक विधीसाठी भिंतीचा आधार घ्यावा लागत आहे. कचरा डेपोचे काम जवळपास सात ते आठ वर्षांपूर्वी येथे करण्यात आले. या ठिकाणी नगर रस्ता आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागातील ओला आणि सुका कचरा गोळा करुन कचरा प्रकल्पाला पाठविला जातो.
जवळपास १५० कामगार येथे काम करतात. कर्मचारी सकाळी सहा वाजताच कामावर हजर असतात. १२ तास ड्युटी असलेल्या कामगाराला मूलभूत सुविधा नसल्याने कामगारांकडूनही संतप्त भावना व्यक्त होत आहेत. नैसर्गिक विधीसाठी या कामगार जवळील स्मशानभुमी येथील स्वच्छतागृहाचा वापर करीत होते, परंतु, स्वछतागृहाला लाॅक करण्यात येत असल्याने आता ते स्वच्छतागृह वापरता येत नाही.
या कामगारांना बसण्यासाठी खोली आहे. मात्र, खोलीत वीज नाही, पंख्याचे कनेक्श्न आहे मात्र पंखेच गायब आहेत. या संपुर्ण परीसराची स्वच्छता करण्याचे गरज असुन या कर्मचाऱ्यांना किमान मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत सोरटे व नीतीन बर्गे यांनी केली आहे.
“आरोग्याच्या दृष्टीने येथील कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात मात्र माननीय आणि पालिका प्रशासन जाणीवपूर्वक हा प्रश्न का प्रचलंबित ठेवत आहे, याचे उत्तर प्रशासनानेच द्यावे.” – शशिकांत सोरटे, सामाजिक कार्यकर्ते