अध्यक्ष शेरकर : कारखान्याच्या 38 व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन
ओझर – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा 24 हजार 715 एकर ऊस क्षेत्राची नोंद झालेली असून यंदा 10 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी ऊस तोडणी व गाळपाचे योग्य नियोजन करण्यात आले असून शासनाचे धोरणानुसार गाळप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केली.
जुन्नर तालुक्यातील 38 व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर व त्यांच्या सुविद्य पत्नी मोनिका मेहेर या उभयतांच्या हस्ते सोमवारी (दि. 16) सकाळी 9.30 वाजता निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथे अगदी साध्या पद्धतीने पार पडले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले यांच्यासह सर्व संचालक मंडळ, सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. भास्कर घुले म्हणाले की, विघ्नहर कारखान्याने ऑफ सिझनमधील मशिनरी देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण केलेली असून कारखाना ऊस गाळपाकरीता सज्ज झालेला आहे.
अनिल मेहेर यांनी स्व. शेठबाबा व स्व.आण्णांच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. याप्रसंगी विघ्नहर ट्रस्ट संचलित स्व.प्रा.रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थीनी शाल्मली शिंदे हिला जिल्हास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धत सुवर्णपदक तसेच विभागस्तरीय स्पर्धेत कांस्य पदक आणि साई जगताप हिचा जिल्हास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास शेटे यांनी तर संचालक विवेक काकडे यांनी आभार मानले.
शेतकरी, कामगारांची दिवाळी गोड करणार
यावर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे कार्यक्षेत्रात हुमणी किडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला असल्याने उसाचे सरासरी एकरी टनेज घटणार आहे. तसेच चाऱ्यासाठीही मोठ्या प्रमाणावर ऊस जाण्याची शक्यता आहे. विघ्नहर कारखान्याकडून नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले जात असून यंदाही विघ्नहरचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांची दिवाळी गोड करणार आहे. तसेच येत्या आठवड्यात मंत्री समितीची बैठक होणार असून या बैठकीत गळीत हंगाम सुरू करण्याची तारीख निश्चित होणार असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
सध्या पर्जन्यमान मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने पाणी बचतीचे धोरण ठरवावे लागणार आहे. त्याचबरोबर पाणी बचतीसाठी आपले जुन्नर व आंबेगांव या दोन्हीही तालुक्यातील नेतृत्वाने प्रयत्न केले पाहिजेत. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ यांच्याकडून चालविण्यात येत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत परदेशांमधून उसाच्या नवनवीन जातींचे वाण आणून त्यावर संशोधन करून नवीन वाण विकसित करण्यात येत आहेत. त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतऱ्यांनी घ्यावा.
– अनिल मेहेर, कार्याध्यक्ष, ग्रामोन्नती मंडळ, नारायणगाव