अरूणकुमार मेटे
सविंदणे – देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत प्रगतीची दालने सर्वसामान्यांसाठी खुली जात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, पुण्याला खेटून असलेल्या शिरूर तालुक्यातील सविंदणे गावाजवळील वस्तीमधील मुलांना ओढ्यातील पाण्यातून जीवघेणी वाट काढत ज्ञानार्जनासाठी शाळेची वाट धरावी लागत आहे.
पुणे जिल्हा हा राज्याच्या नकाशावरील प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु त्याचबरोबर जागतिक नकाशावर झळकलेला हा प्रगत आणि आधुनिकतेची कात टाकून आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून ओळख आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख अधोरेखित झाली आहे. शिक्षणातील दर्जा, गुणवत्ता वाढविणाऱ्या शाळा शिरूर तालुक्यात आहेत. मात्र, अनेक गावांत तसेत वाड्या- वस्त्यावर बिकट स्थिती शिक्षण क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत.
स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांत शिक्षण क्षेत्राने आमुलाग्र बदल पाहिला. त्यात गावकुसातील मुले सातासमुद्रापार गेली. मात्र, अनेक गावातील मुलांना शाळेत ज्ञार्नाजनासाठी येण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. हे शिक्षण क्षेत्रातील अधोगतीचे लक्षण मानले जात आहे. शिरूर तालुक्यातील सविंदणे हे गाव पाच हजार लोकसंख्येचे आहे. येथे लोणी- धामणीवरून वाहणाऱ्या ओढ्यावर गावच्या उत्तर बाजूला भोरवस्ती, पडवळमळा, मडके आळी, किठेमळा, प्रगतीनगर आदी लोकवस्त्या आहे.
पूर्वीच्या काळी शेतीच्या ठिकाणी सोयीनुसार मोठ्या प्रमाणात विखुरल्या आहेत. ओढ्यावर पूल नसल्यामुळे जीवघेणा मार्ग काढत ओढ्याच्या कमरेइतक्या पाण्यातून मार्ग काढत विद्यार्थ्यां शाळेत जाण्यासाठी धक्कादायक प्रवास करीत आहेत. तसेच नागरिकांचे दळणवळणासाठी पूल नसल्याने प्रचंड हाल होत आहे. ओढ्यावरील पुलाचे काम करण्यासाठी नागरिकांची मागणी आता जोर धरू लागली आहे.
बऱ्याच दिवसापासून अनेक पुलांची, विकासकामांची मागणी होत असताना राजकिय उदासीनता दिसून येत आहे. सविंदणे गावाला अपुरा निधी उपलब्ध होत असल्याची खंत उपसरपंच भाऊसाहेब लंघे यांनी व्यक्त केली आहे.
झेडपी कारभाऱ्यांकडून दुर्लक्ष
सविंदणेमधील या वस्त्या आहेत. कवठे येमाई गणात जिल्हा परिषद सदस्य विद्यमान सुनीता गावडे हे पतिनिधीत्व करतात. मात्र, त्यांनाही हा प्रश्न दिसला नसल्याने पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. वास्तवित झेडपी सदस्यांकडून हा प्रश्न धसास लागू शकता असता. मात्र, मार्गी लागला नाही. हे गाव आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघात आहे. गेल्या 75 वर्षांत अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी नेतृत्व केले. मात्र, प्रत्येकांना हा प्रश्न दुर्लक्षित करावासा वाटला, अशी संतप्त प्रतिक्रिया कवठे येमाई गणातून उमटत आहे.
निवेदन देऊनही आतापर्यंत कार्यवाही शून्य
सविंदणे येथील शाळेत जाण्यासाठी ओढ्यांना आलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे पाण्यातून मार्ग काढण्यात हाल होत आहेत. यात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे 4 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ वाया जात आहे. वस्तीवरील सुमारे 100 मुले शाळेत येतात. पुलांची कामे लवकर मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन, भेटीगाठी घेतल्या आहेत. मात्र, कार्यवाही शून्य आहे. पूल बांधण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.