मराठा समाजाच्या वतीने अंकुश राक्षे यांचा सरकारला इशारा
राजगुरूनगरात बेमुदत साखळी उपोषण सुरू
राजगुरूनगर : अंतरवाली-सराटी येथे मनोज जरांगे याना सरकारने मराठा आरक्षणासाठी शब्द दिला आहे. तो शब्द सरकारने फिरवला तर तालुक्यातील मराठा समाज पेटून उठेल. बेमुदत साखळी उपोषण हा फक्त ट्रेलर आहे संपूर्ण पिक्चर बाकी आहे. कोणत्याच मंत्र्यांना तालुक्यत फिरू देणार नाही, फसवेगिरी सरकारने थांबवावी अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन सुरू होईल, असा धडक इशारा मराठा समाजाच्यावतीने माजी सभापती अंकुश राक्षे यांनी सरकारला दिला आहे.
मराठा आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मराठा समाजाच्या इतर मागण्या शासनाने तात्काळ मान्य कराव्यात या मागणीसाठी अंतरवाली-सराटी येथे मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाच्या धर्तीवर रविवारपासून (दि. 1) खेड तालुका क्रांती मोर्चाच्या वतीने राजगुरूनगर शहरात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीपुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत साखळी उपोषण खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोहर वाडेकर, अंकुश राक्षे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले आहे.
या आंदोलनाची सुरुवात राजगुरुनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज,हुतात्मा राजगुरु स्मृती शिल्पातील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग सुखदेव आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार घालून झाली.त्यानंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले. यावेळी कैलास लिंभोरे, बाबाजी काळे, ऍड. निलेश आंधळे, ऍड. अनिल राक्षे, दिलीप होले यांच्यासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने तसेच पहिल्या दिवशी बहिरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंकुश राक्षे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही शासनाने ते तात्काळ द्यावे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागील चाकण येथील आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यात आमचा दोष नव्हता; मात्र यापुढे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर ठोक मोर्चा खेड तालुक्यातूनच निघेल याची सरकारने दखल घ्यावी. केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी धोरणात्मक निर्णय घेत मराठा आरक्षण द्यावे, मराठा आरक्षण मिळण्यासाठी केलेले आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न करू नये, असे आवाहन केले.
भाजप युवा नेत्याचा राजीनामा
या आंदोलन दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपचे युवा नेते बापू थिटे यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. अन्य मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचे त्यांनी आवाहन केले.
मराठा समाजाचे विधानसभेत 174 आमदार असून त्यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न होत नाहीत ही खेदाची बाब आहे. जरांगे पाटील यांना 14 तारखेपर्यंत सरकारने अल्टिमेट दिला आहे. तोपर्यंत आम्ही शांत आहोत, सरकारने शब्द पाळला नाही तर मराठ्यांचा रोषाला सामोरे जावे लागेल.
– मनोहर वाडेकर, अध्यक्ष, मराठा क्रांती मोर्चा, खेड तालुका