पारंपरिक पिंड कोंडण्याचा विधी
बेल्हे – जून महिना तसेच जुलै महिना अर्धा उलटून जात असताना अणे पठारावरील शिंदेवाडी, व्हरूंडी, भोसलेवाडी, पेमदरा, आनंदवाडी परिसरातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. गुरुवारी (दि. 13) दुपारी श्रीरंगदास स्वामी महाराज मंदीरात श्रींच्या आरतीवेळी महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून यावर्षी दुष्काळाच्या व नापिकीच्या पार्श्वभूमीवर पाऊस पडावा म्हणून पारंपारिक पिंड कोंडण्याचा विधी भोळ्याभाबड्या भाविकांनी पार पाडला. पाऊस पडावा असे साकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, पक्काभाऊ दाते यांनी केले.
मृगाच्या भरवशावर होणाऱ्या खरीप हंगामातील बाजरी, मटकी, उडीद, मूग, हुलगा आदी कडधान्याच्या पेरण्या खोळंबल्या असल्याची माहिती देवस्थानचे माजी अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त विनायक आहेर यांनी दिली. गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास पाहता या वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर खरीपाची पेरणीच न झाल्याने तसेच काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने पाण्यावाचून जनावरं भुकेनं तडफडून जातील तर धान्याच्या अभावी कुटुंबांना देखील स्थलांतर करावे लागेल की काय? अशी भीती शिंदेवाडी चे सरपंच अजित शिंदे यांनी व्यक्त केली.
दुष्काळाची चाहुल व दाहकता पठारावर पहिल्यांदाच इतकी निर्माण झाली असल्याचे वृद्ध लोक सांगता आहेत. 21 व्या शतकात तंत्रज्ञानाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करत असताना स्वातंत्र्योत्तर काळातही हा पठार भाग मात्र कायम तहानलेलाच राहिला असून एवढ्या सोयीसुविधा, गाड्या- घोड्या असूनही अन्न पाण्यासाठी वणवण भटकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी केले.
मतदानावर बहिष्कार
आणे पठारावर दुष्काळाचे सावट पसरले असताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात विधानसभेत उपस्थित करावा व या भागासाठी कुकडी प्रकल्पातून उपसासिंचन योजना मार्गी लावण्यासाठी तारांकित प्रश्न मांडावा अशी मागणी, आणे गावचे माजी सरपंच योगेश आहेर यांनी केली व आमदारांनी विधानसभेत प्रश्न विचारला नाही तर यापुढील काळात ग्रामसभांनी घेतलेला मतदानाच्या बहिष्काराचा ठराव कायम राहील असा इशारा देखील आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला. तर पठारावर मतं मागायला येताना पुढाऱ्यांना शेतकरी वर्गाच्या तीव्र रोषास समोरे जावे लागेल, असे चित्र दिसत असल्याचे पेमदऱ्याचे उपसरपंच बाळासाहेब दाते यांनी सांगितले.