गणेश आंग्रे
पुणे -“पुण्याचा पालकमंत्री मीच होणार असून, विकास कामांची यादी तयार ठेवा.’ अशा थेट शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वास दिला आहे. या विधानामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडेच येण्याचे स्पष्ट संकेत खुद्द त्यांनीच दिले आहेत.
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता त्यांच्याकडेच अर्थ खाते सोपविण्यात आले आहे. दरम्यान, अजितदादांना शुभेच्छा तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी त्यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “पुण्याचा पालकमंत्री मीच होणार आहे. काही विकास कामे असतील तर मला सांगा, ते मी पूर्ण करतो,’ असे पवार यावेळी सांगितले, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली. पवार यांच्या या व्यक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनाही बळ आले आहे.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात वर्चस्व राखायचे असेल, तर पालकमंत्री पदही आपल्याकडे असणे अजित पवारांना महत्त्वाचे ठरते आहे. शिवाय त्यांना जिल्ह्याची इत्यंभूत माहिती आहे. गावोगावीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची ओळख आहे. अजित पवार यांनी यापूर्वीही पालकमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद होते.
करोनाकाळात पवार यांनी चांगले काम केले आहे. तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला गती, नोंदणी व मुद्रांक भवन, सारथी संस्थेला जागा मिळवूण देणे, सारथी संस्थेची इमारतीचे कामही त्यांच्याच काळात सुरू झाले. गुंठेवारीचा निर्णयदेखील त्यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला. याचसह ग्रामीण भागात सद्धा मोठ्या प्रमाणावर निधी देऊन त्याठिकाणी विकासकामे सुरू करण्यात आली. आता पवार हे सत्तेत सहभागी होऊन त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी आली आहे.
खडान्खडा माहिती
मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याचे नेतृत्व अजित पवार करत आहेत. प्रशासकीय कामकाजात त्यांचा हातखंडा आहे. शहरासह ग्रामीण भागातील समस्यांची जाण तसेच कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे अर्धवट अवस्थेत आहे. कोणती कामे प्राधान्याने पूर्ण करायची आहेत, याची त्यांना माहिती आहे. त्यामुळे आता पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यास विविध कामांना गती मिळणार आहे, असे कार्यकर्ते सांगत आहेत.