पेरणे येथील घटना : आईच्या विरहाने हृदयविकाराचा झटका
वाघोली – आईमध्ये मुलाचा जीव गुंतलेला असतो. आई नसेल तर जीव ओवाळून टाकायला मुलगा तयार होतो, अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पेरणे (ता. हवेली) येथे घडली. आईच्या निधनानंतर मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुलाचाही मृत्यू झाला आहे.
पेरणे (ता. हवेली) येथील कृष्णाबाई हनुमंत वाळके (वय 92) यांचे रविवारी (दि. 12) रात्री 8 वाजता निधन झाले. त्यांची सोमवारी (दि. 13) सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमी जवळ विसाव्यासाठी खांदेकऱ्यांनी मृतदेह ठेवला असता त्यावेळी मुली, सुनांनी दुःखाचा ठाहो फोडला. त्याचवेळी आईच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने मुलगा शिवाजी वाळके (वय 65) यांना हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्याचा मृत्यू झाला. आईच्या पाठोपाठ मुलाची देखील अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण पेरणे गावावर शोककळा पसरली आहे.
शिवाजी वाळके शिवाअण्णा म्हणून गावात परिचित होते. गावात पाच वर्षे सरपंच होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देहु ते पंढरपूर पायी वारीत असलेल्या सिध्देश्वर प्रासादिक दिंडीच्या स्थापने मध्ये त्यांचा सहभाग होता. उपाध्यक्ष म्हणून ते काम पहात होते. त्यांनी सलग दहा वर्षे पायी वारी केली. गावातील यात्रा, जत्रा, अखंड हरिनाम सप्ताह, गणपती उत्सव, नवरात्र, जयंती, पुण्यतीथी असे विविध कार्यक्रम त्यांच्याशिवाय पार पाडत नसत. पण आईचा मृत्यू झाला, हेच त्यांच मन स्वीकारायला तयार नव्हते.
ते समाजात वावरत होते, काही सुचना देत होते. आईचे जाणे सांगण्यापलिकडे होते. गावकी, भावकी, पै पाहुणे, सर्व गोतावळा स्मशानभूमीत घेऊन गेले. आई आपल्याला सोडून जाणार हा धक्का सहन न झाल्याने हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्यापूर्वीच त्यांनी मृत्यूला जवळ केले आणि आईला कवटाळून आई बरोबरच गेले. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचे एकापाठोपाठ निधन झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण वाळके समाजबांधवांना मोठा मानसिक हादरा बसला आहे.