भातउत्पादक शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग
पवनानगर – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा भातपिकासाठी प्रसिद्ध आहे. मावळ तालुक्याला भाताचे आगार मानले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर विविध जातीचे भातपीक घेण्यात येते. डोंगर उतारावर भाताची शेती केली जाते. परंतु 7 जूनला दाखल होणारा मान्सून अद्यापपर्यंत मावळात दाखल न झाल्याने मावळवासीय शेतकऱ्यांपुढे भाताच्या दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग दाटून आले आहेत.
भारतीय हवामान खात्याने यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. गुरुवार (दि. 9) रोजी मावळात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे पवन मावळसह मावळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती. परंतु आठ दिवस होऊनही पुन्हा पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.
पवन मावळातील लोहगड, तुंग, मोर्वे, चावसर, शिळीम, जवण, तिकोना, ठाकूरसाई, दुधिवरे, शिंदगाव यांच्यासह तालुक्यातील अनेक गावांतील भात पेरणी पूर्ण झाली आहे. तालुक्यात सुमारे 12 ते साडेबारा हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात येते. सध्या तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मावळात इंद्रायणी, फुले समृद्धी, पार्वती, सोनम, तृप्ती, साईराम व परिसरातील स्थानिक जातीचे वाण पेरणीसाठी शेतकरी वापरतात.
जून महिना अर्धा संपत आला तरी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. या दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल नाही तर धूळवाफेवर पेरलेली बियाणे पिठाळण्याची शक्यता आहे. पवना नदीकाठावर व धरण परिसरातील शेतकरी सिंचनाच्या साह्याने भातरोपांना पाणी देतात. अन्य शेतकरी पावसावरच अवलंबून आहेत. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. जर दोन दिवसांत पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.
बळिराजाला आर्थिक संकटाचा धोका
मागील आठवड्यात मान्सूनचा पाऊस झाल्याने मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात पेरणी केली आहे. भात पेरणी केलेला भात उगवून आला आहे. परंतु भाताला जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते. परंतु वरुणराजाने बळिराजाकडे पाठ फिरविल्याने मावळ तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. जर पुन्हा भात पेरणी करण्याची वेळ आली तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. त्यामुळे बळिराजा चिंताग्रस्त आहे. निसर्गाने यंदा तरी अवकृपा दाखवू नये, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.