शेतकरी खातोय खस्ता पण ग्राहकांचे बजेट कोलमडल्याच्या पोस्ट
बेलसर – देशभरातील सोशल मीडिया सध्या टोमॅटोच्या बाजारभावाची चर्चा करीत आहे. बाजारात टोमॅटोची किरकोळ विक्री 100 रुपये ते 200 रुपये प्रती कीलो होत असल्याने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले असले तरी शहरातील खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लालबुंद टोमॅटोने नेटकऱ्यांचे डोळे लाल नक्कीच केले आहेत.
समाजात कोणतीही गोष्ट घडली की नेटवर (सोशल मीडिया) प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. खरा खुरा पाऊस येवो न येवो शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारे मिम्स, मेसेज नक्की येत आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि. 16) शेतऱ्यांचा माल 30 ते 90 रुपये प्रती किलो खरेदी केला गेला. तर किरकोळ विक्री ही दुप्पट किंमतीने केली जाते. त्यामुळे शहरी ग्राहकांचे बजेट कोलमडले किंवा ढासळले अशा प्रतिक्रीया सोशल मीडियावर उमटत आहेत.
सोशल मिडियावर नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.त्यामध्ये “एक किलो टमाटर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू’, अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तर बाजारभाव जास्त असल्याने टोमॅटोची शेतातून चोरीही सुरू आहे. वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून “टोमॅटो गिफ्ट दिले’ असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच टोमॅटोमुळे हाणामारी व वाद झाले असल्याच्या बातम्याही झळकल्या आहेत.
तेव्हा नेटकरी झोपले असतात का?
अनेक हंगाम शेतकरी टोमॅटो बांधावर तर कधी बाजारातच फेकून देतो तेव्हा नेटकरी झोपले असतात का? जेव्हा शेतमाल कवडीमोल बाजारात विकला जातो तेव्हा कोण बोलते का? तर अनेक रोग किडी यांचा सामना करून उत्तम गुणवत्ता पूर्ण माल बाजारात आणण्यासाठी लागणारे कष्ट याचा कोणी विचार करते का? तर या भाववाढीचा नक्की शेतकऱ्यांना कीती फायदा होणार? अशीही चर्चा रंगली आहे.
शेतकऱ्यांना नक्की काय फायदा होणार?
टोमॅटो दरांमध्ये केंद्राने केलेला हस्तक्षेप सुरू असलेली शेतीमालाच्या बाजारभावावरील राजकारण यामुळे सोशल मीडियावर वातावरण तापले आहे. राजकीय नेते मंडळी यांची एकमेकांवर सुरू असणारी टीका टिपण्णी यामुळे नक्की शेतकऱ्यांना फयदा काय होणार हाच प्रश्न आहे. तर मागिल अनेक वर्षे खस्ता व दुख: सहन करुन शेतकरी चालुवर्षी थोडा स्थिर स्थावर होत आहे. या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले आहे, हे ही महत्वाचे आहे.