गेल्या वर्षी पावसामुळे, तर यंदा पावसाअभावी बाजारभाव तेजीत
वाल्हे – पितृपक्षामुळे पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील मंगळवारी (दि.3) आठवडे बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर वाढले होते. नैवेद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, लाल भोपळा, कारले, काकडी, मेथी तसेच, अळूच्या पाने, डाळींब आदींची मागणी वाढली आहे.
यावर्षी, मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस पडला नव्हता. यामुळे वाल्हे व परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांवर टॅंकरने अद्यापही पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नसल्याने, शेतातील पिंके करपून गेली होती. मागील आठवडयात थोड्या प्रमाणात वाल्हे व परिसरात पाऊस पडला. मात्र, मागील तीन दिवसांपासून पाऊसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने व उन्हाळ्या सारखे कडक ऊन पडत असल्याने, शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत आहेत.
मागील वर्षी, पितृपक्षाच्या आगोदर 15 दिवस जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला खराब झालेल्या बाजारामध्ये भाजीपाला जास्त प्रमाणात उपलब्ध होत नव्हता. यावर्षी मात्र, पाऊस नसल्याने, शेतात भाजीपाला उपलब्ध नसल्याने, व पितृपक्षात लागणाऱ्या सर्वच भाजीपाल्याची मागणी वाढल्याने, या सर्वच भाज्यांचे भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारातील काही भाज्यांचे भाव स्थिर आहेत, तर काहींचे भाव 10 ते 20 रुपयांनी वाढले आहेत. कांद्याचे भाव अजूनही वाढले नसून किरकोळ बाजारात 25 ते 30 रुपयेप्रमाणे त्याची विक्री केली जात आहे. बहुतेक सर्व भाज्या महाग झाल्यामुळे घरातील गृहिणीचे बजेट विस्कळीत झाले आहे.