पुसेगाव -जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या बोगद्यात खटाव तालुक्यातील वेटणे व रणसिंगवाडीच्या हद्दीत गेट बसवण्याच्या मुख्य मागणीला शासनाने “वर्धनगडचा घाट’ दाखवून फसवणूक केली आहे. या गावांच्या हद्दीत कायमस्वरूपी गेट बसवण्याचा लेखी आदेश मिळेपर्यंत बोगद्याचे काम बंदच राहील, असा निर्धार ग्रामस्थांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
वेटणेचे उपसरपंच महेश नलवडे व संजय नलवडे म्हणाले, जिहे-कठापूर योजनेचे पाणी नेर धरणातून माणमधील आंधळी धरणात नेण्यासाठी बोगदा खोदण्यात आला आहे. या बोगद्यामुळे वेटणे आणि रणसिंगवाडी परिसरातील जलस्रोत आटल्याने भीषण पाणीटंचाई झाली आहे. ग्रामस्थांनी 2008 मध्ये आंदोलन आणि सातारा येथे वाढे फाट्यावर रास्ता रोको केला होता.
2019 मध्ये बोगद्याचे काम सुरू करण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी आले असता, ग्रामस्थांनी अटकाव केला होता. त्यानंतर बोगद्यात एक मीटर उंचीचे गेट बसवणे, नेर धरणातून वेटणेमध्ये कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करणे, बोअरवेल अधिकृत करणे, वेटणे हद्दीतील पाण्यावर ग्रामस्थांचा हक्क राहील, नेर योजनेचे काम त्वरित सुरू करून, एका वर्षात गावाला पाणी दिले जाईल, तलाव व बंधारे भरून दिले जातील, असे लेखी आदेश जिहे-कठापूर योजनेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता एस. आर. बोडखे यांनी दिले होते.
या आदेशाची अंमलबजावणी जलसंपदा विभागाने अद्याप केलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नुकतेच उपोषण केले. यामध्ये दोन्ही गावांतील विरोधकांनी राजकारण केले आहे. उपोषणकर्त्यांना या संदर्भात शासनाने लेखी आदेश दिलेला नाही. असे असताना त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता उपोषण सोडलेच कसे? लेखी आदेश आणि गेटचे काम प्रत्यक्षात सुरू होत नाही, तोपर्यंत बोगद्याचे सुरू करू दिले जाणार नाही. शिवाजी नलवडे, आनंदराव नलवडे, नितीन नलवडे, अक्षय नलवडे, सचिन नलवडे, दिनेश देवकर, चंद्रकांत नलवडे, नवनाथ नलवडे, अधिक धुमाळ, दीपक कोरडे, निवास खरात उपस्थित होते.
विरोधकांनी लेखी आदेश दाखवावा
दोन्ही गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन केले. दोन्ही गावांच्या हद्दीत गेट बसवण्याचा लेखी आदेश आहे का, याचा खुलासा उपोषणकर्ते व विरोधकांनी गावासमोर करावा. त्यांच्याकडे आदेश असेल, तर त्यांचा जाहीर सत्कार केला जाईल, असे मनोज नलवडे म्हणाले. माढा मतदारसंघात बोगद्यामध्ये गेट बसवून बाधित गावांना पाणी दिले आहे. त्याचप्रमाणे आम्हालाही पाणी द्यावे, अशी मागणी संजय नलवडे यांनी केली.
गुलालाची उधळण करणे अशोभनीय
वेटणे व रणसिंगवाडी हद्दीवर गेट बसवले जावे, यासाठी गेली 15 वर्षे झाली सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. याच मागणीसाठी उपोषण सुरू होते. गेट बसवण्याचा लेखी आदेश नसताना गुलालाची उधळण आणि मिरवणुका काढणे लोकप्रतिनिधी आणि विरोधकांना शोभत नाही, अशी प्रतिक्रिया वेटणे ग्रामस्थांनी व्यक्त केली.