बारामती : माणुसच परिस्थिती बनवतो आणि बिघडवतो. त्यामुळे परिस्थितीला दोष देऊ नका. संकटे, अडथळे आणि अडचणी या तुमच्यातील कौशल्य बाहेर काढतात. चांगली मूर्ती बनायची असेल तर घणाचे घाव सोसावेच लागतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले. इंदापूर येथील डॉ. कदम गुरुकुल कॅम्पसमधील १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या ‘गरुडझेप यशाची’ कार्यक्रमात ते बोलत होते.
बारामती येथील १७२९ आचार्य अॅकॅडमीने इंदापूर येथील डॉ. कदम गुरुकुल कॅम्पसमध्ये आपली शाखा सुरु केली आहे. याच ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ते म्हणाले की, जिज्ञासू वृत्ती असेल तर आकलन होते. त्यातून विषय समजतो. या विषयावर सततची मेहनत घेतली तर ज्ञानप्राप्ती होते. अकरावी आणि बारावी ही दोन वर्षे गाढवासारखी मेहनत केली तर पुढचे आयुष्य सिंहासारखे जगाल आणि जर आता सिंह व्हायला गेला तर पुढच्या सगळ्या आयुष्यात गाढवासारखे काबाडकष्ट करावे लागतील. वेळ विकत मिळत नाही. त्यामुळे आता तुमच्या हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करुन घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
लोकशाही मार्गाने चालणारी, आनंदी आणि आत्मविश्वास देणाऱ्य़ा शाळेची उभारणी आम्ही करीत आहोत. आम्ही विद्यार्थ्यांना गुरु समजतो. शिक्षक हे विद्यार्थी बनून विद्यार्थ्यांकडून शिकत असतो. गरुड पक्षाप्रमाणे अडचणींच्या पार जाऊन केवळ नदीच नव्हे तर समुद्रापार जाणारी गरुडझेप घेण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना तयार करत आहोत, असे यावेळी डॉ. लहू कदम गुरुकुलचे संस्थापक डॉ. कदम यांनी सांगितले. प्रा. बापू काटकर सर यांनी आभार मानले.
बारामतीसह वाकड, बालेवाडीत शाखा प्रवास
एका छंदातून सुरु झालेला १७२९ आचार्य अॅकॅडमीचा हा प्रवास केवळ पाच ते सहा वर्षात बारामतीसह वाकड, बालेवाडी येथपर्यंत पोहोचला आहे. आता इंदापूर येथे ही शाखा सुरु करीत आहोत. इंदापूर येथे १०० जेईई आणि १०० नीट असे एकुण २०० विद्यार्थ्यांपासून ही शाखा सुरु होत असल्याची माहिती यावेळी आचार्य अॅकॅडमीचे संस्थापक प्रा. ज्ञानेश्वर मुटकूळे यांनी दिली.