अर्थार्जनावर परिणाम होत असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांची धाव
पारगाव – लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून असणाऱ्या फूल शेतीकडे दुग्धव्यवसायाप्रमाणे आर्थिक उलाढाल करणारा हा व्यवसाय आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून प्लॅस्टिक फुलांनी भारतातील बाजारपेठा काबीज केल्या आहेत. उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांची मागणी घटत आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थार्जनावर होत आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी व शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या प्लॅस्टिक फूल उत्पादकांविरोधात खुटबाव (ता. दौंड) येथील फूल उत्पादक शेतकरी राहुल पवार यांनी राष्ट्रीय हरित लवाद यांच्या पुणे न्यायालयात याचिका दाखल केली.
यापूर्वी ठराविक कट फ्लॉवर पद्धतीची देशी विदेशी प्लॅस्टिक फुले मार्केटमध्ये असायची, परंतु दोन वर्षांपासून शेवंती, झेंडू, गुलछडी, मोगरांसारखी हुबेहूब प्लॅस्टिक फुलांनी बाजारपेठेत बस्तान बसवले आहे. यावर्षीच्या गणेशोत्सव काळात प्लॅस्टिक फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. त्यानंतर कितीतरी प्रमाणात ती फुले कचऱ्याच्या स्वरूपात अनेक ठिकाणी दिसली. त्यामुळे पवार यांनी पर्यावरणीय बाजूने विविध चाचण्या करून, तज्ज्ञांचे अभिप्राय घेतले आहेत.
पर्यावरणाची हानी व शेतकऱ्यांचे नुकसान यावर न्यायालयात युक्तीवाद झाला आहे. प्लॅस्टिक फुले ही बंदीच्या कायद्यात येऊन ती पूर्णपणे बंद झाली पाहिजेत. पवार यांच्या या मागणीला संमती दर्शवून न्यायालयाने संबंधित विभागांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. वरील विषयाला अनुसरून संपूर्ण देशात ही बंदी असावी, अशी मागणी सुद्धा न्यायालयाने मान्य केली असल्याचे पवार यांनी सांगितले.
यासाठी राष्ट्रीय हरित लवाद समोर पवार यांची बाजू मांडण्यासाठी ऍड. सुधाकर आव्हाड, ऍड. चेतन नागरे, ऍड. सिद्धी मिरघे यांनी काम पाहिले. शेतकरी मार्गदर्शन दीपक चव्हाण, रितेश पोपळघट, आणि सेंद्रिय शेती सल्लागार तुषार मुळीक यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी ही न्यायालयीन लढाई लढत आहे. प्लॅस्टिक बंदी चळवळीतील कायदेशीरपणे बंदी हा दुसरा टप्पा होता. शासकीय स्तरावर सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबाजूने चित्र स्पष्ट होईल.
– राहुल पवार, खुटबाव ता. दौंड