संतोष पवार
सातारा – जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीची झालेली वाताहात पाहून राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी याचे खापर आमदारांसह पदाधिकाऱ्यांवर फोडले आहे. घरात बसून पक्ष वाढणार नसून दौरे काढा, अशा शब्दांत अजितदादांनी सोळशी (ता. कोरेगाव) येथील कार्यक्रमात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.
सोळशी येथील कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक- निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळसकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ते म्हणाले, “राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप व शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यापासून जिल्हा राष्ट्रवादीमध्ये मरगळ दिसून येत होती.
याऊलट भाजप व शिंदे गटाच्यावतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, सहकारी संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर ही मरगळ बाजूला ठेवावी लागणार आहे. पक्षाने अनेकांना आमदार केले, अनेकांना वेगवेगळी पदे दिली. मात्र, तरीही त्यांच्याकडून म्हणावे तसे काम होताना दिसत नाही.” सत्ता गेली म्हणून हातावर हात धरुन घरात बसण्यापेक्षा पदाधिकाऱ्यांनी दौरे काढून पक्षीय बांधणी मजबूत करावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली. आगामी निवडणुका जिंकून सत्तास्थाने काबीज करायची असतील तर गट, तट विसरुन एक दिलाने काम करा, असा कानमंत्रही अजित पवार यांनी दिला.
केवळ निवडणुका आल्या की उमेदवारी मागायची आणि निवडून आल्यावर पक्षीय शिस्त, पक्ष कार्यालयाचा विसर पडायचा असे आता चालणार नाही. ज्यांना उमेदवारी, पदे दिली जातील त्यांनी पक्षाच्या चौकटीत राहून काम करावे लागेल, अशी शब्दांत अजितदादांनी समाचार घेतला. दरम्यान, अजित पवार यांनी झाडाझडती घेतल्यानंतर पक्षातील मतभेद मिटून जिरवाजिरवी, अडवाअडवी थांबणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीची बैठक
गेल्या काही दिवसांपासून सातारच्या राष्ट्रवादी भवनात जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील वगळता जास्त कोणाचे येणे जाणे झाले नाही. मात्र, सोळशी येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी आमदारांसह पदाधिकाऱ्यांचे कान टोचताच दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतरही तरी पक्षातील हेवेदावे मिटणार की मागचे दिवस पुन्हा पुढे अशीच परिस्थिती राहणार हे आगामी काळातच दिसणार आहे.