विठ्ठलवाडी, बोराटेवस्ती येथील शेतकऱ्यांचे कायमचे नुकसान
इंदापूर – संत तुकाराम महाराज पालखी मार्ग इंदापूर तालुक्यातून जात असल्यामुळे, या पालखी मार्गाचा फायदा वारकरी तसेच पुणे व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आगामी काळात मिळणार आहे. असे असले तरीदेखील कोट्यवधी रकमेचे टेंडर असताना नैसर्गिक असणाऱ्या टेकड्या फोडून त्याचा मुरूम व दगड वापरून, पालखी मार्ग बनवण्याचा घाट काही ठेकेदार तालुक्यामध्ये करीत आहेत. यामुळे विठ्ठलवाडी, बोराटेवस्ती, सुरवड या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
इंदापूर शहरातून पुढे सराटी मुक्कामकडे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जात असताना, गोखळीचा ओढा हा उतार व चढत असणारा नैसर्गिक समतोल साधणारा परिसर होता; मात्र येथील शेकडो शेतकऱ्यांचा नागरिकांचा विचार न करता, वीस ते तीस फूट खोल टेकड्या फोडून, या शेतकऱ्यांची नागरिकांची कायमची वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे. पालखी मार्गाचे काम संबंधित ठेकेदाराने सुरू ठेवले आहे. तालुक्यातून आपल्या भागातून पालखी मार्ग जात असल्याचा आनंद नागरिकांना एकीकडे असतानाच, हातावरचे पोट असणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारा रस्ता, घरी जाणारा रस्ता कायमचा बंद होणार असेल तर किती मोठे दुःख त्या शेतकऱ्यांना असणार, याचा विचार केलेला दिसत नाही.
मुरूम तसेच दगड इंदापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कामात वापरले आहेत. जिथे गरज आहे तिथे असे प्रयोग करणे, गरजेचे असते; परंतु बोराटवाडी, विठ्ठलवाडी, सुरवड, येथील स्थानिक नागरिकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून न घेता रस्त्याच्या कामांमध्ये मनमानी सुरू झालेली दिसते. तसेच रस्ता हा तटबंदी युक्त ठेवण्यासाठी रस्त्याच्या कडेने सिमेंटच्या भिंती काही फुटाच्या बांधल्या जात आहेत; मात्र या भिंती कायमस्वरूपी टिकण्यासाठी यावरती पाणी मारणे किंवा या भिंतींना पाया मजबूत करणे हे महत्त्वाचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकारने कोटयवधी निधीच्या रकमा या पालखीमार्गासाठी दिलेला वाया जाणार का? अशीही खुलेपणाने चर्चा इंदापूर तालुक्यात रंगलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांना, ज्या गावकऱ्यांना अडचणी असतील. त्या समजावून घेऊन, संबंधित विभागाने पर्यायी रस्ते निर्माण करून देऊन शेतकऱ्यांची समस्या निकालात काढावी. यासाठी आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित रित्या प्रशासनाकडून योग्य त्या सूचना देऊन, काम करून घ्यावे अशी ही अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.