चांडोलीत 4 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
राजगुरुनगर – आमची मदत ही सर्वसामान्य माणसांसाठी असते, पक्ष हा पुढाऱ्यांना असतो, सर्वसामान्य माणसाला नसतो. सर्वसामान्य माणसाला पिण्याचे पाणी, चांगला रस्ता, चांगले आरोग्य आदी गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असते. गावात होणाऱ्या विकास कामासाठी राजकीय पक्ष, पक्षातील व गावातील अंतर्गत वाद विसरून सर्वांनी एकत्र राहण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची असते, असे प्रतिपादन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
चांडोली (ता. खेड) येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांतून व विकास निधीतून चांडोली गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे व गावातील अंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण करणे आदी सुमारे 4 कोटी 83 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, दूध संघाचे संचालक अरूण चांभारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, माजी सभापती अंकुश राक्षे, बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, माजी सभापती विनायक घुमटकर, संचालक जयसिंग भोगाडे, पपू टोपे, रणजित गाडे, युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, शहराध्यक्ष सुभाष होले, नवनाथ होले, संध्या जाधव, मनीषा टाकळकर, चिका वाघमारे, चांडोलीच्या सरपंच सुनीता चेतन सावंत, उपसरपंच सतीश सावंत, सदस्य आरती डोळस, रुपेश ताये, स्वाती वाघमारे, शंकर सावंत, अंजना वाघमारे, सचिन वाघमारे, प्रिया पवळे, दिगंबर सावंत, संतोष काळे, नितीन भंडलकर, कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र मुळे, अभि शेंडे, किरण तनपुरे, किशोर डोळस, दिनेश कड, सागर सातकर, सिद्धार्थ कांबळे, पप्पू बनसोडे, वैभव नाईकरे, गणेश शेळके, चेतन सावंत, योगेश सावंत, संभाजी काळे, ग्रामसेवक प्रताप गुरव यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोहिते पाटील म्हणाले, चांडोली गावाला मोठे वैभव प्राप्त होणार आहे. हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ स्मारकासाठी शासन 256 कोटी रुपये देणार असून भीमा नदीकडेचा भाग विकसित केला जाणार आहे. येथील कातकरी वस्तीचे स्थलांतर दुसऱ्या चांगल्या जागेत त्यांना सुसज्ज घरे बांधून करण्यात येणार आहे.
आमदार मोहिते म्हणाले की, राजगुरूनगर व चांडोली ही दोन्ही गावे भीमा नदीवरील तिन्ही पुलांमुळे जोडली गेल्याने या गावाचा विकास होणार आहे. विकासासाठी निधीही कमतरता भासणार नाही. एकजुटीने गावाचा विकास करण्यासाठी आपसातील मतभेद विसरून काम करावे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांडोली गावात ग्रामीण रुग्णालय, राज्यातील उत्तम दर्जाचा आयटीआय व समाजकल्याण विभागाची वसतिगृह बांधण्यात आली आहेत त्यामुळे गावाचे महत्व वाढले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक माजी सरपंच संतोष काळे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास दुधाळे यांनी केले तर योगेश सावंत यांनी आभार मानले.
अजितदादांना पाठिंबा दिल्याने विकासाला गती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे तालुक्यातील सर्व जनता ठाम राहिल्याने विकास कामांना गती मिळणार आहे तर विविध विकास कामासाठी मोठ्या निधीची तरतूद होणार आहे. अधिवेशन झाल्याबरोबर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आवश्यक विकास कामासाठी निधी मिळेल. सर्व कार्यालये एकत्र आणणारी प्रशासकीय इमारतींसह राजगुरूनगर शहरातील अनेक कामे मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याचे आमदार मोहिते यांनी यावेळी सांगितले.
चांडोली गावासाठी महत्त्वाचा प्रश्न पाणी योजनेमुळे सुटणार आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरणार आहे. चांडोली गाव स्मार्ट व्हीलेज म्हणून उदयाला येत आहे. चांडोली गाव दत्तक घेऊन या गावाचा विकास करावा. राजगुरूनगर शहराच्या जवळचे गाव आहे. त्यामुळे उत्पन्न वाढत आहे. विकासाच्या माध्यमातून गावाचा विकास करू तर आगामी काळात या गटाचा जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निवडून आणू, असा आमचा निर्धार आहे.
-अंकुश राक्षे, माजी सभापती खेड