– हिमांशू
संख्या वाढतच चालली. धडधडा पेटून थंड झालेल्या चितेतून आणखी दोघीजणींचे चेहरे दिसू लागले. सांगू लागले, “होय, माणसातल्या पशूने आमचीही शिकार केली.’ झीरो नंबरने दाखल केलेल्या तक्रारी जशा वाढत जातील, तसा पीडितांचा आकडाही वाढणार, असं सांगितलं जाऊ लागलं. अर्थात, झीरो नंबरने दाखल केलेल्या तक्रारी गुन्हा घडलेल्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात पोहोचायला लागणारा वेळ अठराव्या शतकातला असून, घटनांमधील मानसिकता आणि क्रौर्य तर आदिम काळातलं आहे. त्यामुळं चित्र स्पष्ट व्हायला किती दिवस लागतील देव जाणे! हिंसाचार सुरू झाला आणि घरं पेटू लागली, तेव्हा लोकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला.
हिंस्र जमावाच्या तावडीतून जे सुटले, त्यांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन तिथल्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मग त्या हिंसाग्रस्त भागातल्या पोलीस ठाण्यापर्यंतचा तक्रारीचा प्रवास बराच लांबला. जीवाच्या भीतीनं घरात कोंडून घेतलेल्या लोकांना तपासातल्या प्रगतीबद्दल काहीही माहिती नाही. गुन्हा घडून दोन महिने आणि तक्रार वर्ग होऊन एक महिना झाला, तरी फायली थंडगार पडलेल्या. बिचारे पोलीस तरी काय करणार? त्यांच्याच चौकीतून शस्त्रं पळवून दंगलखोर माणसं मारत सुटलेले. दोन महिलांना विवस्र करून त्यांची धिंड काढली गेली. त्यांना नाचायला लावलं. त्यांना वाचवायला आलेल्या एकीच्या भावाला ठार मारलं. मग जवळच्या शेतात सामूहिक बलात्कार झाला. पीडितांची संख्या तीन असल्याचं नंतर समजलं.
तिसरी एका लष्करी जवानाची पत्नी. कारगिलचं युद्ध लढलेल्या या जवानाला आपल्या राज्यातला संघर्ष कारगिलपेक्षा भयानक वाटतो. ज्याला सन्मानानं मिरवावं, अशा जवानाच्या संपत्तीची, घरदाराची आणि आब्रूची राखरांगोळी होते. पाठोपाठ आणखी दोन तरुणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या केल्याची घटना समोर येते. इम्फाळमधील एका गॅरेजमध्ये गाड्या धुण्याचं काम करणाऱ्या या तरुणींच्या घरात शे-दोनशे लोक घुसतात. सामूहिक बलात्कार करून दोघींचा निर्घृण खून करतात. एका पीडितेची आई जीव वाचवून पळ काढते. मूळ गावी येऊन ती तक्रार नोंदवते आणि ती इम्फाळला वर्ग व्हायला एक महिना लागतो. याच घटनेत तिचे अनेक नातेवाईक मृत्यूमुखी पडतात किंवा जायबंदी होतात. रक्तरंजित हिंसाचाराच्या कितीतरी घटना…
मणिपूरमध्ये इंटरनेट बंद असल्यामुळे त्या आपल्यापर्यंत यायला उशीर झाला, हा युक्तिवादही आपण आजच्या जेटयुगात बिनबोभाट मान्य करतो. मग पीडितांवर सुरू होतो आणखी एक अत्याचार! देशाची अब्रू वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागली जाते. कोणत्या राज्यात ती अधिक प्रमाणात गेली, याचा हिशोब सोशल मीडियावर सुरू होतो. चर्चेपासून पळ काढणं, चर्चेची दिशा बदलणं सुरू होतं. पीडितांच्या किंकाळ्या विरतात.
भांडण कुणाचंही असो, लढतो पुरुष आणि मरते स्त्री. भांडण तरी कशासाठी? जन्मजात श्रेष्ठत्वासाठी, वर्चस्वासाठी! जन्म जिथून झाला ती कूस परिणाम भोगायला तयार आहेच! शत्रुपक्षातली स्त्री म्हणजे दंगेखोरांचं सॉफ्ट टार्गेट! प्रतिस्पर्ध्याचा जास्तीत जास्त अपमान करण्यासाठी आई-बहिणीवरून शिव्या हसडायच्या आणि तरीही राग शांत झाला नाही तर त्या आया-बहिणींवर अत्याचार करून स्वतःला “मर्द’ म्हणवून घ्यायचं. दुरून पाहणाऱ्यांनी अत्याचाराची राजकीय विभागणी करून सोशल मीडियावर मर्दुमकी गाजवायची. म्हणजे, अत्याचारानंतर पुन्हा अत्याचार… वारंवार!