जीवनावश्यक वस्तूंची निर्यात थांबवणार
मुंबई, दि. 23 – सरकार सर्व जीवनावश्यक वस्तूंची, विशेषतः भुईमूग, साखर, चहा तेल व केळी यांची निर्यात थांबवील, असे आश्वासन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी दिले. मधल्या दलालांचेही उच्चाटन करण्यात येईल. कांदे व बटाटे सोडून इतर सर्व भाजीपाल्याच्या निर्यातीस बंदी घालण्यात आली आहे. जनसामान्यांच्या वापरातील सर्व जिनसांच्या निर्यातीस परवानगी देण्यापूर्वी “गरजा आधी भागविणे’ हे जे सरकारचे धोरण आहे, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
आकाशवाणीला बंधनातून मुक्त करू
मुंबई – नभोवाणीला राजनैतिक व नोकरशाहीच्या बंधनातून मुक्त करणे हे नव्या सरकारचे ठाम उद्दिष्ट आहे, असे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी जाहीर केले. संबंधित व्यावसायिक व तज्ज्ञ यांची मते मागवीत आहोत. आकाशवाणी व दूरचित्रवाणीला अधिक स्वायत्तता देण्याच्या निर्धाराचा मी पुनरुच्चार करीत आहे. आकाशवाणीचा व दूरचित्रवाणीचा पक्षासाठी वा व्यक्तिगत स्वार्थासाठी उपयोग न करण्याचा जनता सरकारने निर्धार केला आहे, असेही ते म्हणाले.