खासदार सुप्रिया सुळे यांच्या गावोगावी भेटीगाठी : सर्वसामान्यांशी कनेक्ट
नवरात्रीचा धागा पकडत गावागावांत संवादाचा जागर
प्रमोद ठोंबरे
बारामती – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी आणखी जोमाने ऍक्टिव्ह मोडवर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांतील गाठी भेटी वाढल्या आहेत. सुळे यांनी नवरात्रीचा धागा पकडत गावागावांत संवादाचा जागर सुरू केला आहे. यातून सुळे यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न, निराकारण यावर भर देत कनेक्टीव्हिटी वाढवली असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या गावभेट दौऱ्यामुळे बारामती तालुक्यात राष्ट्रवादीत चैतन्याची लकेर उमटली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी मतदारसंघातील भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, खडकवासला येथील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दौऱ्याने पदाधिकाऱ्यांना उभारी मिळाली आहे. दौऱ्यात सीतारामन यांनी राष्ट्रवादी, सहकार क्षेत्रातील पवार कुटुंबीयांचा दबदबा, घराणेशाहीवर आदी मुद्द्यांवर प्रहार केले. हा दौरा भाजपाच्या संघटनासाठी उपयुक्त ठरला आहे.
सीतारामन यांच्या दौऱ्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुळे यांनी कोणतीही टीकात्मक वक्तव्य केले नाही. प्रत्येक पक्षाची ध्येय, धोरणे, संघटन असतात. त्यांना अधिकारी आहेत. असे वक्तव्य करी सीतारामन यांच्या दौऱ्यात एकप्रकारे दुर्लक्षित केले. फारसे महत्त्व दिले नाही.
सीतारामन यांचा दौरा झाल्यानंतर राष्ट्रवादी आणखी जोमाने ऍक्टिव्ह मोडवर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांतील गाठी भेटी वाढवत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. चार दिवसांपूर्वी घटस्थापनेचा मुहूर्त साधून सुळे यांनी गावागावांत विकासकामे मार्गी लावण्यासाठी चर्चा केली.
गेल्या आठ वर्षांत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रूपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. याचा फायदा 2019 मधील लोकसभा निवडणुकीत झाला आहे.
राज्यातील सत्तेच्या चाव्या आता एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणसवीस यांच्या ताब्यात असल्याने बारामती ही भाजपच्या मिशन 45 वर रडारवर आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी भाजपाच्या हायकमांडने कंबर कसली आहे. यात अर्थमंत्री सीतारामन यांना जबाबदारी दिली आहे. भाजपाकडून पावणेदोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करून 2014 मधील चित्र उभे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भविष्यात मतदारांशी संवाद तुटू नये, यासाठी खासदार सुळे यांच्याकडून गावपातळीपर्यंत कामांचा विस्तार केला जात आहे. जेणेकरून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे मनसुबे यशस्वी होऊ नयेत, यासाठी खासदार सुळे ऍक्टिव्ह मोडवर आल्या आहेत.