लोणी देवकर – सध्याची थंडीची लाट रब्बी हंगामातील गहू पिकास पोषक ठरत असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे. त्यामुळेच गहू पीक जोमदारपणे वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पहावयास मिळत आहे. फेब्रुवारी महिना चालू झालेला असला आणि उन्हाची चाहूल लागत असली तरी थंडीचा कडाका कायम आहे. आणखी काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
गहू पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत केली जाते; मात्र लांबलेल्या थंडीचा फायदा घेत अनेक शेतकर्यांनी 20 ते 30जानेवारी पर्यंत गव्हाची पेरणी केली आहे. उशिरा पेरणी केलेले गव्हाचे पीक सध्या थंडीचा कडाका वाढल्याने जोमदार वाढत आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
लाेकवन वाणास पसंती
गहू पिकाच्या पेरणीसाठी गेली 2 दशकांपासून एचडी- 2189 या वाणाला शेतकर्यांची पसंती आहे. लोकवन हे वाण इतर वाणांपेक्षा 15 दिवस लवकर पक्व होते. त्यामुळे उशिराने पेरणीसाठी लोकवन या वाणास शेतकर्यांनी पसंती दिली आहे, अशी माहिती गहू उत्पादक शेतकर्यांनी दिली. दरम्यान, पोषक वातावरणामुळे सध्या रब्बी हंगामातील हरभरा पिक ही जोमदार आले आहे.
सेंद्रिय शेतीकडे वाढता कल
सध्याच्या बदलत्या नैसर्गिक परिस्थिमुळे पिकांवर पडणार्या वेगवेगळ्या रोगराईमुळे शेतकरी विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे वळत आहे.यामध्ये प्रामुख्याने कोंबडखत वापरले जात आहे. इतर खतांच्या तुलनेत हे खत स्वस्त आणि पिकांना पोषक असल्याने शेतकर्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढला आहे.