वडूज : मुलगी हे परक्याचे धन आहे ही संकल्पना बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अॅड. अश्विनी जगदाळे यांनी केले.
सिद्धेश्वर कुरोली येथे औंध, ता. खटाव येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी कुरोलीच्या सरपंच शितल देशमुख होत्या. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ.हणमंत पोळ, प्रा. शहनाज मोमीन, प्रा. सुधाकर कुमकर, प्रा. सर्जेराव भोसले, प्रा.जगन्नाथ ननवरे,प्रा.तुषार सावंत, प्रा. गजानन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
अॅड. अश्विनी जगदाळे म्हणाल्या, आज जरी स्त्री बाहेर पडत असली तरी समाजकंटकांना तिला तोंड द्यावे लागते. तिची छेड काढणे , बलात्कार यांसारख्या घटना आजही घडत आहेत. या घटनांना रोखण्यासाठी स्त्रीने सजग झाले पाहिजे. न घाबरता तिथे कायद्याचा आधार घेतला पाहिजे.
स्त्रियांसाठी खूप कायदे आहेत, पण या कायद्यांची अंमलबजावणी नीट होण्यासाठी स्त्रियांनी स्वतः च पुढाकार घेतला पाहिजे. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढे असल्याचे दिसते. स्त्रियांची स्थिती सुधारली आहे परंतु ती आणखी सुधारणे गरजेचे आहे. वसुधा निकम हिने प्रास्ताविक केले. सानिका मांडवे हिने सुत्रसंचालन केले. पूजा थोरवे हिने आभार मानले. कार्यक्रमास शिक्षकेतर कर्मचारी मोहन माकार, राजू शेख, शिबीरार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी, सिद्धेश्वर कुरोली व परिसरातील महिला उपस्थित होत्या.