दूध ओतून मंचर येथे प्रांतअधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
मंचर – गेल्या सहा महिन्यांपासून दूध दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, शेतकऱ्यांकडून २६ रुपये दराने दूध खरेदी केले जात आहे. दुधाची विक्री किंमत ५६ रुपये प्रति लिटर आहे. खरेदी दर व विक्री दरात जवळपास ३० रुपये प्रतिलिटरचा फरक असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून, शेतकऱ्यांना प्रतिलिटर ४० रुपये दूध दर द्यावा अन्यथा सरकारच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिला.
दुधाची दरवाढ करावी, या मागणी करता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. १) यांनी दूध ओतून मंचर (ता. आंबेगाव) येथे प्रांतअधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले, तसेच शेतकरी जनआक्रोश आंदोलन प्रसंगी देवदत्त निकम बोलत होते.
यावेळी कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते धोंडीभाऊ भोर, नागापूरचे सरपंच गणेश यादव, बाबाजी खानदेशे, दत्ता विश्वासराव, संतोष गावडे, वणाजी बांगर, राजू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवदत्त निकम म्हणाले, शासनाने १४ जुलै २०२३ रोजी निर्णय घेऊन ३.५/८.५ या गुणप्रतिच्या दूधास ३८ रुपये प्रतिलिटर दर निश्चित केला आहे; परंतू सध्या दूधाला २६ रुपयांप्रमाणे दर दिला जात आहे.
आंबेगाव तालुक्यात रोज १५ लाख लिटर दूध संकलित होत असून, शेतक-यांचे दैनंदिन नुकसान शासनाच्या धोरणानुसार दिवसाला १ कोटी २० लाख रुपये होत आहे, तर प्रति महिना नुकसान ३६ कोटी रुपये होत आहे. शेतक-यांची लूट थांबविण्याची जबाबदारी ही सरकारची असून, सरकारने शेतकऱ्यांची दूध खरेदी दर ४० रुपये करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
आंबेगाव, जुन्नर व शिरूरच्या परिसरात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील वर्षी कांदा अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नसून काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची कांदा रोपे, कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
शासनाने त्वरीत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व कर्जाचे पुनर्गठण न करता पीक कर्जे माफ करावी अशी मागणी ही निकम यांनी केली आहे. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजु इनामदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, किसान काँग्रेसचे अध्यक्ष राजू बेंडे पाटील, गणेश खानदेशे, माऊली ढोमे, अशोक डोंगरे, बाळासाहेब बाणखेले, आदींची भाषणे झाली. यावेळी आंदोलकांचे निवेदन मंचर प्रांत कार्यालयातील सचिन मुंढे आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी स्वीकारले .