खेडमध्ये पाणीटंचाईसह विविध प्रश्नांमुळे लोकप्रतिनींधी द्विधाअवस्थेत
राजगुरूनगर – सध्या लोकसभा निवडणूक धामधूम सुरू आहेत. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवार यांचा प्रचार गावभेट दौरे खेडच्या पूर्व भागातील दुष्काळी गावात होत आहेत. पाण्याची वानवा असलेल्या या गावात गावभेट दौर्यासाठी आलेल्या उमेदवार आणि प्रचार करणार्या पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पाणीटंचाईच्या झळा सोसणार्या गावकर्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला संतप्त भावना व्यक्त करीत नेतेमंडळींना पाणउतारा करीत आहेत.
खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन योजनेची कामे झाली आहेत. काही ठिकाणी पूर्णत्वास आली आहेत. काही गावांमध्ये ती अपूर्ण आहेत. अनेक गावांमध्ये जलजीवन योजनेची अपूर्ण आणि दर्जाहिन व निकृष्ट कामे सुरू आहेत त्या कामाबाबत प्रचार काळात गावकर्यांच्या रोषाला लोकप्रतिनिधिना सामोरे जावे लागणार आहे. अपुर्ण असलेल्या विकासकामांबाबत ग्रामस्थांमध्ये पसरलेली नाराजी दूर कशी करायची अशा अनेक प्रश्नामुळे, समस्यामुळे लोकप्रतिनिधींची मनस्थिती द्विधाअवस्था होऊन बसली आहे.
खेड तालुक्यातील उन्हाच्या झळा वाढल्याने जलसाठे आटण्याच्या मार्गावर आहेत. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली आहे. खेड तालुक्यात सात गावठाणांसह 100 पेक्षा अधिक वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. काही वाड्यावस्त्यांना रस्ते नसल्याने महिलांना डोक्यावर पाणी न्यावे लागत आहेत. दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाने भामानदी भीमानदीवरील बंधारे भरण्यासाठी कृषीपंपांचा वीजपुरवठा बंद करण्याचे निर्देश दिल्याने नदीच्या पाण्यावर अवलंबून असणार्या शेतकरी वर्गात; मात्र खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे चाराटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून चाराछावण्या उभारण्याची मागणी होऊ लागली आहे.
पाणीटंचाई सुरू झाल्याने काही गावे आणि वस्त्यांमध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पशुपालक शेतकर्यांना पाझरतलाव अथवा नदीवर जनावरे तीन चार किलोमीटरपर्यंत घेऊन जावे लागत आहे. गेल्यावर्षी खेडमध्ये पाऊस चांगला झाला. जलसाठे पूर्ण भरले. तरी मात्र यंदा उष्णतेचे वाढते प्रमाण पहाता जलासाठे झपाट्याने आटू लागले आहेत पाणीपातळी कमी होत असल्याने टंचाईच्या झळा बसत आहेत. यंदा शासकीय टँकरची संख्या वाढण्याबरोबरच अनेक गावांसह वाड्यावस्त्यांची संख्या वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे.
चासकमान, भामाआसखेड धरणातंर्गत पाण्याचे साठे खालावत चालल्यामुळे धरणातंर्गत नदीकडेच्या गावांना पाणीटंचाईची समस्येला यंदा सामोरे जावे लागणार आहे. टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना दिल्याने पंचायत समितीकडे येणार्या प्रस्ताव आणि तत्काळ स्थळपहाणी अधिकार्यांना शक्य होऊन तहसीलदार यांना त्वरीत टँकर मंजूर करणे यामध्ये वेळ वाचणार असल्याने तहानेल्या गावासह वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
12 वाड्यावस्त्यांध्ये धावताहेत टँकर
पूर गावठाणासह चारीघर, पाझरतलाव वस्ती, राऊतमळा, माळावरीलवस्ती, माळाखालची वस्ती, जऊळुके बुद्रुक गावठाणासह येवलेवस्ती, माळवस्ती , वडाचीवाडी, घोसाळेवस्ती, पायराचीवाडी, पाचघरवस्ती, दरावस्ती, मेगंडेवस्ती, आडवळेवस्ती, टोकाचीवाडी, पारधीवस्ती, भाईदरा, वरुडे गावठाणासह गणेशनगर, पंचवाडी, चौधरवाडी, पाढंरीवस्ती, बेंदवस्ती, पश्चिम बेंदवस्ती, मोळकी, नालगडवस्ती, कातोरेमळा, तांबेवाडी, वाळुंजस्थळ, पलिकडचे न्याहर अशा 12 वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
खेड तालुक्यातील पूर्व भागातील पूर, वरुडे आणि जऊळके बुद्रुक या तीन गावांसह त्यांच्या वाड्यावस्त्यांना तीन अधिग्रहण केलेल्या विहिरीतून तीन शासकीय टँकरने रविवार (दि. 7) पासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तीन टँकरद्वारे दररोज 11 फेर्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
– विशाल शिंदे, गटविकास अधिकारी, खेड