रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास : नगरपालिकेकडून कारवाई
आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर रस्ता व पदपथावरील बेकायदा टपरी हातगाडीची अतिक्रमणे नगपालिकेने थेट जेसीबी लावून जमीनदोस्त केली.
आळंदी शहरात अतिक्रमणाचे पेव फुटले होते. त्यामुळे पदपथावर तर चालणेही कठीण झाले होते याबाबत वारंवार अतिक्रमणांवर कारवाईची मागणी जोर धरीत होती. अखेर पालिकेने जेसीबी लावून हातगाड्या व टपऱ्या काढल्या. खासकरून पालिका चौक, पुणे-आळंदी रस्ता, भैरोबा चौकात पालिकेने हातगाड्या खाद्यपदार्थाचे स्टॉल हटविले.
चाकण चौक शाळेसमोरील पदपथावर नव्याने झालेल्या टपऱ्याही हटविल्या. त्यामुळे या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. आता मंदिराकडे येणारे मार्ग, शनिमंदीर रस्ता, भराव रस्ता, मरकळ रस्ता या ठिकाणी रस्त्यातील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे. अनधिकृत शेडबांधकाम करून अनेकांनी व्यावसायिक गाळे बांधले, त्यावर पालिकेचा हातोडा फिरणार आहे.
आता सतत अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाईल. खासकरून पदपथ मोकळे केले जातील. मंदिर परिसरातही रस्त्यावरील व पेढेवाल्यावर कारवाई करून माल जप्त केला जाईल. स्वेच्छेने अतिक्रमण काढून घेण्याबाबत पालिकेने अगोदरच सूचित केले होते. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
– अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी