वाहतूककोंडीबाबत खासदार सुळेंशी बारभाई यांची चर्चा
जेजुरी – जेजुरी शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार्या आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रोजच होणार्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक व्यवसायिक, वाहनचालक व भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लावायचा असेल तर बाह्यवळण करण्यात यावा किंवा शहरातून जाणार्या मार्गाचे उत्तर-दक्षिण दोन्ही बाजूला समसमान भूसंपादन करून उड्डाणपूल निर्माण करावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि.26) या बारामतीहून पुण्याकडे जाताना जुनी जेजुरी येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी थांबल्या होत्या यावेळी बारभाई यांनी त्यांची भेट घेत जेजुरीत होत असलेली वाहतूक कोंडी, समस्या आणि स्थानिक व्यवसायिकांची मागणी याबाबत चर्चा केली. याबाबत राष्ट्रीय महामार्ग व भूसंपादन अधिकार्यांच्या बरोबर बुधवारी (दिर 27) पुणे येथे बैठकीचे आयोजन करून उपाययोजना काढण्यात येईल, असे आश्वासन खा.सुळे यांनी दिले .
योग्य न्याय हवा -व्यवसायिकांची मागणी
सध्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण द्रुतगतीने सुरू असून विकासकामांना आमचा विरोध नाही. रुंदीकरण व्हावे, अशी आमची इच्छा आहे मात्र 2015 मध्ये आमची दुकाने घरे हटवून रुंदीकरणास आम्ही जागा दिली होती. सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरिता पुन्हा आम्ही आमच्या मालकीची जागा देत आहोत. त्याचा मोबदला शासनाकडून मिळत असला तरी तो अत्यंत कमी आहे. तो वाढवून मिळावा. उत्तर-दक्षिण दोन्ही बाजूला समसमान अंतर टाकून भूसंपादन करून काम करण्यात यावे.
तसेच मध्यवस्तीमध्ये व्यवसाय व निवास असलेला काकडे परिवार रुंदीकरणामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असून त्यांचे सरकारी जागेत पुनर्वसन करावे, अशी मागणी आमची असून या मागण्या मागील दोन वर्षांपासून आम्ही करत आहोत; परंतु त्यामधून काहीच निष्पन्न झाले नसल्याने पर्यायाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून (क्र.4522/2023) तात्पुरता स्थगिती आदेश घेतला असल्याचे याचिकाकर्ते उद्योजक विजय झगडे, ऋषिकेश दरेकर, सागर काकडे, संतोष झगडे आदींनी सांगितले .