माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान
एम. डी. पाखरे
आळंदी-
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि।।
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।
पाहिली शोधुनि अवघी तीर्थे।।
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि. 21) सायंकाळी चार वाजता आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखों भाविक तीर्थक्षेत्र आळंदीत दाखल झाले आहेत. येथील सर्व धर्मशाळा, वारकरी आश्रम, तसेच इतर ठिकाणे वारकऱ्यांनी गजबजली आहेत.
जे वारकरी दिंडीशिवाय सोहळ्यासोबत चालत असतात त्यांनी इंद्रायणी घाटावर आपला तळ ठोकला आहे. एकंदरीतच संपूर्ण
अलंकापुरी ज्ञानोबा माऊली तुकाराम… विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल हरिनामाने दुमदुमली. माऊली मंदिर, इंद्रायणी घाटासह पंचक्रोशीत भजन, कीर्तन, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. जिकडेतिकडे वारकरी आणि दिंडीकऱ्यांचे ट्रक दिसत आहेत.
करोनामुळे गेली दोन वर्षे थांबलेली पायी वारी होत असल्याने वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. आळंदीकर रहिवासी घडेल तशी वारकऱ्यांची सेवा करत आहेत. कोणी 24 तास अन्नदान, पाणी वाटप, वारकऱ्यांना राहण्यासाठी जागा देणे आदी सेवा करत आहेत.
दरम्यान, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्कम हा आळंदीतच माऊलींचे आजोळघरी गांधीवाड्यात असणार आहे. बुधवारी (दि. 22) माऊलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.