वातावरणातील बदलाचा परिणाम : औषध फवारणीवरच अधिक खर्च
वाल्हे – यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने पुरंदर तालुक्यात आगोदर पाणीटंचाई जाणवत आहे. यातच शेतातील पिके कमी पाण्यात घेण्यासाठी धडपडत आहेत. यातच वातावरणातील बदलाने शेतातील पिकांवर किडीच प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडत आहेत.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व धुके यांचा फटका कांदा पिकास बसत आहे. यापासून कांदा रोपे वाचविण्यासाठी मोठ्या फवारण्या कराव्या लागत असल्याने कांदा उत्पादकांचा खर्च वाढत आहे. उत्पादित मालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
पाण्याअभावी व वातावरणातील बदलामुळे होत असलेल्या नुकसानीची भरपाई शासनाने त्वरित द्यावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. सध्या काही ठिकाणी कांद्याचे पीक एक महिन्याचे झाले असून नवीन कांदा लागवड सुरू आहे; मात्र कांदा पिकासाठी पोषक, असे थंडीचे वातावरण कमी होऊ लागले आहे.
ढगाळ वातावरण सकाळच्या धुक्याचा कांदा पिकावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसत आहे. पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, करपा यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्यांना महागडी औषधे फवारावी लागत आहेत. परिणामी कांदा उत्पादन खर्चात भर पडत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
पिकांवर होणार्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकर्यांचा आर्थिक खर्च वाढू लागला असून, शेतकरीवर्ग वातावरणातील बदला मुळे कर्जबाजारी होत आहेत.
– जयवंत भुजबळ, कांदा उत्पादक शेतकरी वाल्हे.