डिंभेतील पाणीसाठ्याचा परिणाम जाणवणार
अरुणकुमार मोटे
सविंदणे – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील सविंदणे, मलठण, कवठे येमाई परिसरात डिंभे धरणाच्या पाण्याच्या आवर्तनांमुळे काही भागातील शेती पिके ‘सुजलाम, सुफलाम’ आहे. परंतु यंदा आवर्तन पुरेसे दिवस न सोडल्याने व त्यातच डिंभे धरणातील पाणीसाठाही कमी होऊ लागल्याने पुढील आवर्तन वेळेत न आल्यास जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
याच गावांतील कामठेवाडी, लाखेवाडी यासह अन्य भागांत धरणाचे पाणी मिळत नसल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. लाखेवाडी, कामठेवाडी परिसरातील वाड्यावस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.
आमदाबादला पिके करपू लागली
आमदाबाद (ता. शिरूर) परिसरातील घोडनदी कोरडी पडल्याने कृषीपंप बंद झाले आहेत. या ठिकाणी शेतकरी नदीवरून उपसा सिंचन करून शेती करीत असतात. आमदाबाद येथील घोडनदीवर कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा असून, ढाप्यांमधून पाणी गळती झाल्याने बंधारा लवकरच कोरडा पडला आहे. परिसरातील पिके करपू लागली आहे. त्यामुळे नदीला लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“घोडनदी कोरडी पडल्याने आमदाबाद परिसरातील पिके करपू लागली आहे. घोडनदीला तत्काळ पाणी सोडून बंधारे भरून द्यावेत.”
– गोटीराम माशेरे, शेतकरी, आमदाबाद.