आळंदी – राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवार (दि. 15) पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी बेमुदत उपोषण इंद्रायणी घाटावर सुरू केले आहे. रात्री उशिरानंतर महाद्वार चौक येथे आंदोलनकर्ते मोहन ओवाळ, मुबारक शेख, फारूक इनामदार, दत्तात्रय साबळे यांचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
श्री ज्ञानदेवांचे जन्मापासून ज्ञानवाहिनी होऊन मिरवणारी इंद्रायणी आज विज्ञान वहिनीच्या रूपाने मिरवत आहे; परंतु ज्ञानवाहीनीचा नितळ स्वच्छ पणाचा बाज आज विज्ञान वाहिनी होऊन गमावला गेला आहे. यास जबादार आजची राजकीय आणि सामाजिक दायित्व असलेली व्यवस्था आहे. म्हणून पवित्र इंद्रायणीस प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करून, गत वैभव प्राप्त करून देण्याचे दायित्व याच दोन्ही व्यवस्थांचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या वतीने श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे इंद्रायणी प्रदूषण मुक्तीकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या
* उगमापासून लोणावळा, श्रीक्षेत्र देहू-आळंदी ते तुळापूर भीमा संगमापर्यंत इंद्रायणीत सोडल्या जाणार्या सांडपाण्यास शतप्रतिशत प्रतिबंध व्हावा, त्यासाठी इंद्रायणी तिराच्या नागरी व औद्योगिक वसाहतीतून येणारे पाणी प्रवाहापर्यंत येऊ न देता शुद्धीकरण करून शेती, बांधकाम तथा औद्योगिक वापरात आणावे. आजच्या प्रदूषित पाणी वापराने शेती व शेतकर्यांच्या आरोग्यास धोका आहे.
* इंद्रायणीच्या दोन्ही तिरालगत नागरी व औद्योगिक घनकचरा डेपोस परवानगी असू नये. शिवाय श्रीक्षेत्र देहू-आळंदी या तीर्थक्षेत्रातील नागरी घनकचरा रोजच्या रोज या तीर्थक्षेत्रा बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावावी. त्यासाठी राज्यसरकारने पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी विशेष निधीची तरतूद करून विशेष योजना जिल्हा प्रशासनाचे देखरेखेत राबवाव्यात.
* इंद्रायणीच्या पाणीस्त्रोताशी प्रत्यक्ष संबंध येणारे प्रदूषण कमीत -कमी व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कार्याची जाणीव व आवड असलेल्या क्रियाशील औद्योगिक तथा स्वंयसेवी संस्थामार्फत अभ्यासपूर्ण विविध उपक्रम राबवून इंद्रायणी व देहू -आळंदी परिसर कायमस्वरूपी प्रदूषण मुक्त राहण्यासाठी प्रयत्न करावे.
* इंद्रायणी पात्रालगतच्या आर्थिक दुर्बल गावांच्या नागरी तथा औद्योगिक प्रकल्पांचे सांडपाणी जसेच्या तसे इंद्रायणी पात्रात येते.त्या पाण्यावर राज्य शासना मार्फत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवले जावेत. आज मितीस इंद्रायणी पात्रातील पाणी लगतचे नागरिकांचे व देहू-आळंदी येणार्या भाविकांच्या आरोग्य धोकादायक आहे. तरीही देहू-आळंदीस येणारे भाविक श्रद्धेने इंद्रायणीत अंघोळ करतात. किमान त्यांच्या करीता तरी राज्यशासनाने पावले उचलावीत.