बारामती/ जळोची – मराठा समाजावरील अन्याय दूर करण्यासाठीची आरक्षणाची लढाई सुरू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. इतकं निष्ठूर सरकार कधी पाहिलं नाही. आरक्षण कसे देत नाही ते बघूच असा इशारा उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी बारामती येथून सरकारला दिला. आरक्षणाचा लढा जिंकल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी केला.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी बारामती येथे शहरातील तीन हत्ती चौकात आयोजित सभेत टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मराठा समाजासोबत गद्दारी करू शकत नाही.
आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी लढाई सुरू आहे. आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवायचा आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. कुणबी प्रमाणपत्र घ्यायला हरकत कशाला, असा सवाल जरांगे यांनी नारायण राणे यांना केला.
ते म्हणाले की, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. आरक्षणास विरोध केला तर सोडणार नाही, आरक्षणाचा लढा आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आहे. ही लढाई गरजवंत मराठ्यांचा लढा आहे.