राजूर – महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसूबाई शिखरावर भाविकांनी नवरात्रोत्सवानिमित्त पाचव्या माळेला अलोट गर्दी केल्याने कळसूबाई शिखर गर्दीने फुलून गेले होते.
आदिवासींचे कुलदैवत असलेल्या कळसूबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी नवरात्रोत्सवात परिसरातील भाविकांसह इगतपुरी, ठाणे जिल्ह्यातील भाविक येत असतात. नवरात्रोत्सवात पाचव्या, सातव्या व नवव्या माळेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
भाविकांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय असते. दुपारच्या उन्हाचा त्रास नको, म्हणून भाविक पहाटेच गड चढण्यास सुरुवात करतात. सुमारे 1 हजार 646 मीटर उंच असणाऱ्या शिखरावर पोहोचण्यासाठी दरमजल करत दोन ते तीन तास लागतात. अरुंद पायवाट, अवघड ठिकाणी वन विभागाने बसविलेल्या लोखंडी शिड्या, काही ठिकाणी स्थानिक व्यावसायिकांनी उभारलेले स्टॉल अशा उत्साही वातावरणात कळसूबाई मातेचा जयघोष करत शिखरावर पोहोचल्यावर थकवा निघून जातो.
तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर केल्याचे समाधान होते. या काळात प्रचंड गर्दी होत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून स्थानिक स्वयंसेवक, तसेच सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.