पळसदेव – येथे दादाराव शिंदे यांनी विविध मागण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय पळसदेव येथे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं मत शिंदे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.
गावात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत चौकशी व्हावी. सध्या बाजारपेठातील मुख्य रस्त्याचे काम सुरु आहे; मात्र यामध्ये सर्व ठिकाणची अतिक्रमण काढली नाहीत. ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यात भेदभाव केला आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील सर्व अतिक्रमण काढावी, सेना महाराज मंदिरापर्यंत केलेलं अतिक्रमण हटवावे, रखडलेली गटार योजनेची कामे पूर्ण करावीत व नवीन गटार योजना करावी. यांसह इतर मागण्यासाठी सोमवारबेमुदत उपोषण सुरू केले आहे.
शिंदे यांनी उपोषण सुरू केल्यावर सरपंच अजिनाथ पवार व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना भेटून उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती; मात्र सर्व मागण्या मान्य होईपर्यंत शिंदे उपोषणावर ठाम आहेत.
त्यांच्या उपोषणाला गावातून पाठिंबा मिळत आहे. शिंदे यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. या वेळी सहकार सेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष विजय पवार, अंबादास भिसे, भय्या आडवाल सह अनेक नागरिकांनी भेटून शिंदे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.