राजगुरूनगर -“माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत राजगुरूनगर शहरात “घर टू घर’ तपासणी धीम्या गतीने झाली. दोन दिवसांत 9269 कुटुंबापैकी केवळ 4506 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले असून केवळ 3 जण संशयित आढळून आल्या. त्यातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली आहे. राजगुरूनगर शहरात सर्वेक्षण मोहीम दोन दिवसांची होती. मात्र, रविवारी (दि. 20) सुद्धा सुरू राहील व सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी यावेळी सांगितले.
राजगुरूनगर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरत आरोग्य तपासणी मोहीम दोन दिवसांपासून सुरु आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी शहरातील सर्व व्यवहार शुक्रवारे (दि. 18) व शनिवारी (दि. 19) बंद होते. त्यासाठी शहारत सुमारे 100 पपथके कार्यान्वित केली होती; मात्र दोन दिवसांत केवळ अर्धेच सर्वेक्षण झाले आहे. रविवार (दि. 20) असल्याने जरी सर्व आस्थापना बंद असल्या तरी नागरिक रस्त्यावर येणार असल्याने उर्वरित सर्वेक्षण होणार का? करोना आटोक्यात येणार का? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
प्रशासनाकडून ठोस अंमलबजावणी न झाल्याने सर्वेक्षण पाहिजे तसे झाले नाही. शहरातील नागरिक दोन दिवसांपासून तपासणी पथकाची वाट पाहत होते; मात्र तपासणी पथके आलीच नसल्याने नागरिक नाराज झाले आहे.
तालुक्यात सुमारे साडेपाच हजार तर राजगुरूनगर नगर परिषद हद्दीत सुमारे साडेसातशे व्यक्ती करोना बाधित आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात असली तरी नागरिक काळजी घेत नसल्याने संख्या वाढली आहे. दरम्यान, यासाठी प्रशासनाकडून सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनीही दोन दिवस घरी बसून सर्वेक्षण टीमची वाट पहिली; मात्र सर्वेक्षण पथके न आल्याने रविवारी तरी येतील का याकडे नागरिकनचे लक्ष आहे. दरम्यान, एकीकडे संख्या वाढत असताना सर्वेक्षणात मात्र शहरातील निम्म्या कुटुंबातून केवळ एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान, या आरोग्य सर्वेक्षण मोहिमेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी भेट देऊन सर्वेक्षणाचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी संजय तेली, पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, राजगुरूनगर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. सुखदेव पानसरे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
झेडपी अध्यक्षांनी सुनावले
जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना उपचार मिळण्यासाठी साधन सामग्री आणि तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करावी, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.