सातारा – जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेची जबाबदारी देण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनचे सिलिंडर भरण्याची सक्ती केली जात आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या गोडाऊनमधून भरून ते सिलिंडर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उतरविण्यात आले. कंत्राटी कामगारांना दिली जाणारी कामे आता सुरक्षारक्षकांना देण्यात येऊ लागल्यामुळे कंत्राटी कामगार नक्की करतात काय असा प्रश्न निर्माण झाला आहे .
नवीन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या प्रशासनात प्रशासकीय कामाच्या समन्वयावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी 18 सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी फिक्स पॉइंट तयार करण्यात आले असून रुग्णालयाची दोन्ही प्रवेशद्वारे, वार्ड क्रमांक 2 आणि 27, प्रसुतीगृह, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे निवासस्थान
करोना सेंटर याचा त्यामध्ये समावेश आहे. सध्या जिल्ह्यामध्ये करोनाबाधित व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. जिल्हा रुग्णालयातील जवळपास सर्वच वार्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयातून करोनाबाधित व्यक्तींनी पलायन करणे ही बाब नवीन नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांना 24 तास डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो.
जिल्हा रुग्णालय परिसरात शांतता राखणे, रुग्ण आणि नातेवाईक यांच्यात सुसंवाद घडवून आणणे ही प्रमुख कामे ते करतात. चार सुरक्षारक्षकांना जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून एमआयडीसी येथील गोडाऊनमधून ऑक्सिजनचे 20 सिलेंडर आणण्याचे फर्मान सोडले जात असल्याने आपले नक्की काम काय, अशा संभ्रमात कर्मचारी आहेत.
अशा प्रकारची कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सांगण्यात येतात. मात्र, यावेळी सुरक्षा रक्षकांना ही कामे करण्यासाठी सक्ती करण्यात आली. सुरक्षारक्षकांनी आपले काम चोख केले. मात्र, मूळ काम बाजूला ठेवून सुरक्षारक्षकांना अशा प्रकारची कामे सांगितली गेली तर जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.