पेठ येथे अवकाळीच्या नुकसानीची पाहणी
मंचर/पेठ – सरकारने भांडवलदारांचे भले करण्याचे काम सुरू केले असून, दुधाचा विक्रीदर स्थिर असताना खरेदीदर पाडला जात आहे, त्यामुळे हे सरकार शेतक-यांचे नसून दलालांचे असल्याची टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील कुदळवाडी, कोल्हारवाडी, भावडी, थुगाव, कुरवंडी आदी गावांत अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाचा पाहणी दौरा सुषमा अंधारे यांनी गुरुवारी (दि. ३०) केला, यावेळी पेठ (ता. आंबेगाव) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत निकम, शिवसेने ज्येष्ठ नेते राजाराम बाणखेले यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अंधारे म्हणाल्या, गारपिट व अवकाळी पावसामुळे कांदा, ज्वारी, बटाटा व इतर पिके पूर्णपणे नष्ट झाली आहे. गुजरात राज्यात दुधाचे दर स्थिर असून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सर्व अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात अाहे. सरकार स्थिर असेल तर उद्योजक गुंतवणूक करतात. मात्र, महाराष्ट्रात सरकार अस्थिर असल्याने उद्योजक बाहेरच्या राज्यात गुंतवणूक करत आहे, यामुळे राज्याचे नुकसान होत आहे.
ज्वारीला नुकसानग्रस्त पीक यादीत घ्यावे
सातगाव पठार भागात दोन ते तीन हजार एकर क्षेत्रात कांदा लागवड झाली असून, शेतकऱ्याने एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च केला आहे. पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढले असून गारपिट व अवकाळी पावसामुळे पिके पूर्ण नष्ट झाली आहेत. पीक नाहीतर पीक कर्ज कसे भरणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारने सरसकट पीक कर्ज माफ करावे. पीक कर्जातून ज्वारी पिकास वगळण्यात आले अाहे; पण केंद्र सरकारच्या धोरणानुसार ज्वारी हे पीक महत्त्वाचे असून ज्वारीलाही नुकसानग्रस्त पिकांच्या यादीत घ्यावे, अशी मागणी अंधारे यांनी केली.
सातगाव पठारच्या पाणी प्रश्नावर राजकारण
आंबेगाव तालुक्याचे आमदार व सध्या सरकारमध्ये असलेल मंत्री यांनी गेली ३५ वर्ष सातगाव पठारच्या पाणी प्रश्नावर राजकारण करत आपली खुर्ची शाबूत ठेवली आहे. कळमोडीचे पाणी चासकमानमध्ये आणणार त्याच चासकमानचे पाणी सातगाव पठार परिसरात येणार, असे सांगून लोकांना खेळवत ठेवले आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही, उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे, रात्री वीज असल्याने रात्रीच शेतात पाणी भरावे लागते; पण बिबट्याच्या हल्ल्यांनी शेतकरी त्रस्त आहेत. अशा सर्व बाजूने शेतकरी अडचणीत असताना सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही सुषमा अंधारे यांनी सांगितले.