इंदापूर/वालचंदनगर – राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील शेतीमहामंडळाच्या 14 मळ्यांमध्ये तीन पिढ्यांपासून रहात आलेल्या हजारो कामगारांना हक्काच्या घरासाठी दोन गुंठे जागा मिळावी. व खंडकरी शेतकरी बांधवांच्या शेतजमीनीसंर्दभात राहिलेल्या जमीनीचे वाटप करण्यात यावे अशी आग्रही लक्षवेधी सभागृहात लावून धरली. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ या प्रश्न संदर्भात, सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासित केल्याने, 14 मळ्यातील शेकडो वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
आमदार भरणे म्हणाले, कष्टकरी शेतकरी आणि कामगार यांना न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसची असल्यामुळे, अनेक वर्षे खोळंबून राहिलेला कामगारांच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न सुरू केले आहेत. याच भागातील कळंब ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी जलजीवन मिशन मधून पाणीपुरवठा योजना कळंब ग्रामपंचायतीस मंजूर झाली असल्याने, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी शेती महामंडळाकडील रत्नपुरी येथील गट नं. 178/1 (गावकळंब) येथील 10 एकर क्षेत्र या पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलाव व पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागेची मागणी केली आहे.
ती शासनाने तात्काळ मंजूर करावी. त्याचबरोबर कळंब – वालचंदनगर – रणगांव या गावातील मुस्लिम बांधवांच्या दफन भूमीसाठी रत्नपुरी मळामधिल गट नं. 348/1 मधील 3 हेक्टर जागा कायमस्वरूपी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून, शासनाने तो प्रस्ताव तात्काळ मंजूर करून मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीसाठी कायमस्वरूपी जागा द्यावी. अशी आग्रही मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.
महसूल मंत्री घेणार बैठक
कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा देण्यासंदर्भात सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार भरणे यांनी प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले. राज्याचे म्हसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या लक्षवेधीच्या माध्यमातून मांडलेल्या सर्व प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर आमदार भरणे यांच्या समवेत संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासित केले.