आंबेगाव- इर्शाळवाडीतील दुर्घटना ताजी असतानाच पुणे महापालिका हद्दीतील आंबेगाव खुर्द परिसरात असलेल्या जांभूळवाडी रस्ता शनीनगर, हनुमाननगर येथील डोंगर उतारावर वसलेल्या वस्त्यांवर भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका तसेच आपत्ती व्यवस्थापनाकडून याबाबत तातडाने उपायोजना करण्याची मागणी संबंधीत परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आंबेगाव परिसरात मोठ्याप्रमाणात कष्टकरी कामगार वर्ग वास्तव्यास आहे. दैनंदिन उत्पन्न कमी असल्याने कमी खर्चातील घरांच्या शोधात कामगार, मजूर वर्ग या ठिकाणी पोहचत असून यातूनच येथील वस्ती वाढत गेली आहे. आंबेगाव खुर्द हनुमाननगर, शनीनगर परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये कमी भाडे असलेली अनेक घरे दाटीवाटीने उभी केलेली आहेत. यामुळे अनेक कष्टकरी कामगारांच्या वस्त्या या ठिकाणी वसल्या आहेत.
सध्या, शहर आणि उपनगरात पावसाचा जोर वाढत आहे. त्यातच इर्शाळवाडीची घटना नुकतीच घडलेली असताना सदर डोंगर उतारावर वसलेल्या अशा वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांच्या मनातही धस्स होत आहे. मात्र, नाईलास्तव जीव धोक्यात घालून या ठिकाणी रहावे लागत असल्याचे अशा कामगार, मजुरांचे म्हणणे आहे. मात्र, जीवाला धोका असेल तर आमच्यासह कुटुंबांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे, अशीही मागणी होत आहे.
डोंगर उतारावर असल्याने या वस्त्यांवर भूस्खलनाचा धोका आहे. यातून मोठी जीवितहानी होऊ शकते. तत्पूर्वी महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापनने वेळीच लक्ष द्यायला हवे. येथे राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देणे गरजेचे आहे. – पल्लवी जगताप, स्थानिक रहिवासी, हनुमाननगर
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून सदर ठिकाणची पाहणी करण्यात येणार आहे. सध्या, याबाबतची माहिती आपत्ती व्वस्थापनास विभाग देण्यात आली असून याबाबतचा योग्य तो अहवाल आयुक्तांना सादर करणा आहोत. – सुरेखा भणगे, सहायक आयुक्त, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय