मुंबई – खासदार संजय राऊत यांनी आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. यामध्ये ठाकरेंनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही मग त्याचे श्रेय का घेता ? अशी झळझळीत टीका यावेळी ठाकरेंनी भाजपवर केली.
यावेळी बोलताना ठाकरेंनी जुन्या काँग्रेस सरकारचा देखील दाखल दिला. ते म्हणाले,”काँग्रेस काळात जसे मुसलमानाचे ‘इस्लाम खतरे मै है’ असे मोर्चे निघायचे तसे आता हिंदू जनआक्रोश मोर्चे निघू लागले आहेत. मग ९ वर्ष तुम्ही केलत काय ? आजही काश्मीरमध्ये पंडित खतरे मै है असं म्हंटल जातंय मग तुम्ही केलंत काय ? असा सवाल यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला.
मणिपूरमध्ये देखील आज जे मारले जाताहेत ते हिंदू नाहीत का ? ते या देशाचे नागरिक नाहीत का ? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला. माझा देश माझा परिवार आहे. कोविड काळात राबवलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजना आता ‘माझा देश माझी जबादारी’ म्हणून राबवण्याची गरज आहे असं देखील ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. बाबरीच्या वेळी जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार नव्हता.. राम मंदिराचा निणर्य तुम्ही घेतला नाही मग मंदिराचे श्रेय तुम्ही कसे घेऊ शकता. मग हिंदुत्वासाठी तुम्ही केलत काय आणि कुठंय तुमचं हिंदुत्व अशी टीका देखील ठाकरेंनी यावेळी केली.
ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका
“मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत… भन्नाट! ” अशी खोचक प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
बावनकुळे यांनी पुढे म्हटले आहे की,हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे.