अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
पुणे – अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाच्या आदेशानुसार खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे गरजेचे आहे. पुनर्वापर केलेले खाद्यतेल आरोग्यास हानीकारक असते. अशा खाद्यतेलामध्ये टोटल “पोलर कंपाऊंड्स’ तयार होतात. यामुळे उच्च रक्तदाब, धमणीकाठिण्य, अल्झायमर, यकृताचे आजार होतात. हे लक्षात घेऊन खाद्यतेलासंबंधी नियमांचे व तरतुदींचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.
शक्यतो तळण्यासाठी तेलाचा एकदाच वापर करावा. न वापरलेल्या तेलामध्ये 15 टक्क्यांपेक्षा जास्त टोटल पोलर कंपाऊंड्स’ (टीपीसी) आढळता कामा नये. 25 टक्क्यांपेक्षा जास्त “टीपीसी’ आढळल्यास त्याचा पुर्नवापर करु नये. 50 लिटरपेक्षा जास्त खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करणाऱ्या व्यावसायिकांनी खाद्यतेल पुनर्वापराबाबतचा अभिलेख जतन करावा.
अखाद्य खाद्यतेल जमा करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांनी हे तेल बायोडिझेल, साबण, वंगण आदींचे उत्पादन करण्यासाठी वापर करावे. याचा वापर खाद्यपदार्थ निर्मिती, भेसळीकरिता केल्याचे आढळल्यास कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.