नवीन व जुना मुठा कालव्याला पाणी सोडले : तीन तालुक्यांना दिलासा
लोणी काळभोर – तब्बल दीड महिना कालव्याला पाणी नसल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागलेल्या हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडावर हास्य उमटले आहे. नवीन व जुना मुठा अशा दोन्ही कालव्यांना पाणी आल्यामुळे या तीनही तालुक्यातील बळीराजासह लगतची गावेे व वाड्या- वस्त्यांवरील नागरिक सुखावले झाले आहेत.
नवीन मुठा उजवा कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आल्यामुळे पूर्व हवेेेलीत गेल्या काही दिवसांपासूून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती. लोणी काळभोर सह कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, ऊरूळी कांचन या गावातील नळपाणीपुरवठा योजना बाधित झाल्याने संबंधित ग्रामपंचायतींकडून नागरिकांना कमी दाबाने व कमी वेळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. यामुळे ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले होते. परंतू जलसंपदा विभागाच्या वतीने नवीन मुठा उजव्या कालव्यातून नागरिकांंना पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी आवर्तन सोडले असल्याने यापुढील दोन महिने का होईना पिण्याच्या पाण्याची सोय झाली असल्याने नागरिक सुखावले आहेत.
दीड महिना खडकवासला धरण साखळीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागली आहे. गेल्या काही वर्षात खडकवासला धरण साखळीतील चारही धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत होता. सुरवातीला पुणे शहराची लोकसंख्या कमी होती. परंतु नंतर पुणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढली. त्यामुळे शहराची पिण्याच्या पाण्याची गरज वाढू लागली. परिणामी हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील शेतीला होणारा पाणीपुरवठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला होता.
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सरासरी पाऊस पडला आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. दीड महिना नवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी बंद केले होते. पाटबंधारे विभाग व पुणे महानगरपालिका यांच्या मध्ये १९९७ मध्ये झालेल्या एका करारानुसार पुणे महापालिकेने ६ टीएमसी सांडपाणी मुळा मूठा नदीतून उचलून मुंढवा येथे या पाण्यावर प्रक्रिया करायची. नंतर हे पाणी जुन्या मूठा उजव्या कालव्यामधून शेतीला पाणी पुरवठा करायचा. हे पाणी जुन्या मूठा उजव्या कालव्यामधून शेतीला पुरविण्यास पालिकेने सुरवात केली आहे. या पाण्यामुळेच शेती कडक उन्हाळ्यातही टिकून राहिली आहे.
तरकारी पिकांना फाटा
गेली दीड महिना नवा मुठा उजव्या कालव्याला पाणी नसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारभावापेक्षा शंभर – दोनशे रुपये कमी भावाने आपला उस गुऱ्हाळांना देऊन टाकला. विहीरीं, कूपनलिकांना पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी तरकारी. कोथिंबीरीसारखी .पिके घेणे बंद केले होते.
भूगर्भात पाणीसाठा टिकणार
आता पाणी नवीन मुठा उजवा कालव्यात सोडले आहे. साधारण दोन महिने कालव्यामधून हे पाणी वाहिले तर पुढील साधारण दोन महिने तीनही तालुक्यांतील विहिरी व कूपनलिकांना पाणी राहणार आहे. त्यामुळे आगामी काही महिने ६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला पाणी पुरवठा होणार आहे. शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. त्यामुळे तीनही तालुक्यांतील बळीराजा, नागरिक सध्या प्रचंड खुशीत आहेत.