सोरतापवाडी – लग्नसराई जोरात चालू झाली असून लग्न सोहळ्यात मराठा मावळ्यांची वेशभूषा परिधान करून सरबत वाटणे, खाद्यपदार्थ वाटप करणे, अक्षदा वाटणे, आदी कामे केली जातात. पणही कामे करताना परिधान केलेल्या मावळयांच्या वेशभूषेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची विटंबना होत आहे.
लग्न समारंभामध्ये मराठा मावळ्यांची वेशभूषा बंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी सुभाष कड यांनी केली आहे. याविषयी त्यांनी सांगितले की, पूर्व हवेलीतील प्रत्येक कार्यालयात लग्न समारंभ सुरू आहे.
त्यामध्ये मावळ्यांच्या वेशभूषा परिधान करून अनेक दुय्यम कामे करून घेण्यात येतात. कुठलेच काम हे कमी लेखायचे नाही. पण त्यामध्ये परिधान केलेल्या वेशभूषेमुळे छत्रपतींच्या मावळ्यांची विटंबना होत आहे. त्यामुळे असे प्रकार त्वरित थांबवावे. लवकरच या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे. यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
इतर कपडे परिधान करुन लग्न समारंभातील कामे करावी. परंतु मावळयांची वस्त्रे परिधान करू नये, अशी मागणी कड यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे हे आपल्याला वंदनीय असून त्यांची तुलना करता येणार नाही. त्यामुळे लग्न समारंभामध्ये मावळ्यांची वेशभूषा करून ही कामे बंद करावी, अशी मागणी कड यांनी केली आहे.